Join us  

आता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच मुंबईतील वृक्षांवर चालविणार कुऱ्हाड; महापालिकेवर अंकुश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 11:26 AM

राज्य सरकारने नियुक्त केली तीन सदस्यांची समिती

मुंबई :  मुंबई महापालिकेला आता झाडांवर सरसकट कुऱ्हाड  चालवता येणार नाही. कोणतेही झाड तोडताना  ते कापण्यास योग्य आहे का, ते कापण्याची खरोखरच गरज आहे का, हे ठरविण्यासाठी पालिकेला तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त केली आहे.

पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. तसेच विकासकामांसाठी  झाडे तोडायची असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणात  मंजूर करून घ्यावा लागतो.  मात्र, व्यवस्थित छाटणी होत नसल्याने झाडे विद्रूप केली जातात. झाडांवरील पक्षांची घरटी विचारात घेतली जात नाहीत, अशी नागरिकांची तक्रार असते. यापुढे असे प्रकार होणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. झाडे तोडण्याबाबत किंवा  कारण  नसताना झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, या मागणीची दखल राज्य  सरकारने घेतली आहे.

नागरी क्षेत्रातील वृक्षांचे संवर्धन व संरक्षणासाठी स्थानिक वृक्ष प्राधिकरणास त्यांच्या नागरी क्षेत्रामधील वृक्षांची   लागवड, जतन,  संरक्षण व तोडणीचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांचा वापर करताना योग्य सल्ला आवश्यक  आहे.

 या विषयातील अनुभव व तांत्रिक क्षमता असलेल्या तज्ज्ञ  व्यक्तींचा समावेश असलेल्या कंपन्यांचा सल्ला घेण्यासाठी तीन कंपन्यांचे पॅनल नामनिर्देशन  करण्यासाठी सरकार मान्यता देत आहे, असे सरकारने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

...तर तापमानातील वाढ आटोक्यात

शहरी भागात वृक्षांची लागवड, जतन, संवर्धन व संरक्षण करून वनसंपत्ती वाढवणे ही काळाची गरज आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे वातावरणावर होणारे गंभीर परिणाम आटोक्यात आणण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धनाच्या विविध योजना सरकार राबवत आहे. शाश्वत विकासासाठी  वृक्ष नियमावलीची  यशस्वी अंमलबजावणी केल्यास तापमान वाढ रोखण्यात मदत होऊ शकते, असे सरकारने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.