Join us  

आता वाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून

By admin | Published: June 17, 2014 12:38 AM

नव्या पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. लवकरात लवकर प्रशासकीय यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली होत आहेत

वसई : नव्या पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. लवकरात लवकर प्रशासकीय यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली होत आहेत, तर दुसरीकडे राजकीय आघाडीवरही आघाडी सरकारच्या घटक पक्षामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री कोण यावर सर्वत्र गरमागरम चर्चा होत आहे. पालघरचे आमदार व राज्याचे आदिवासी विकासमंत्री राजेंद्र गावित व वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड या दोघांत रस्सीखेच सुरू आहे, परंतु पालकमंत्रीपदाची माळ राज्यमंत्री गावित यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता अधिक आहे.नव्या जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा उभी करणे, त्यासाठी कर्मचारी वर्ग व आर्थिक निधी उपलब्ध करणे व जिल्हा मुख्यालयासाठी मध्यवर्ती ठिकाण निश्चित करणे या कामांना शासनस्तरावर प्राधान्य दिले जात आहे. सध्याची जि.प. बरखास्त करून नव्या जिल्ह्याची निवडणूक घेणे असे एक ना अनेक प्रश्न शासनासमोर असतानाच राजकीय आघाडीवर मात्र वेगळेच नाट्य रंगू लागले आहेत. नव्या जिल्ह्याचा पालकमंत्री नियुक्त करताना राज्य शासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकत्रित जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्यामुळे त्यांनी जिल्हा विभाजन लांबणीवर टाकण्याचे सतत प्रयत्न होत होते, परंतु लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस पराभूत झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी या प्रश्नाला चालना दिली व विभाजनाचा प्रश्न मार्गी लागला, परंतु आता पालकमंत्रीपदावरून दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कॉंग्रेसतर्फे राज्यमंत्री गावित तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची नावे चर्चेत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्याकडे होते, त्यामुळे नवीन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आम्हालाच मिळावे, अशी राष्ट्रवादी कॉंगेसजनांची मागणी असल्याने काही दिवसात या दोन्ही पक्षांत पालकमंत्रीपदावरून जुंपण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)