Join us

उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा २०२४, मानाचि लेखक संघटनेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन

By संजय घावरे | Published: March 15, 2024 4:31 PM

या स्पर्धेत सहभागी होणारी प्रत्येक टीम स्पर्धेच्या दिवशी एक चिठ्ठी उचलेल. त्यात खाली दिलेल्या विषयांपैकी एक विषय असेल.

मुंबई - मानाचि लेखक संघटना अर्थात मालिका, नाटक, चित्रपट लेखकांनी, लेखकांची, लेखकांसाठी स्थापन केलेली संघटना, आपल्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त, छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टच्या सहयोगाने, 'उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा' आयोजित करीत आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

या स्पर्धेची मूळ संकल्पना मानाचिचे संस्थापक सदस्य सुहास कामत यांची आहे. या स्पर्धेत सहभागी होणारी प्रत्येक टीम स्पर्धेच्या दिवशी एक चिठ्ठी उचलेल. त्यात खाली दिलेल्या विषयांपैकी एक विषय असेल. त्या विषयाच्या तयारीसाठी त्या टीमला एक तास दिला जाईल. एक तासानंतर त्या टीमला परीक्षकांसमोर, त्या विषयाचे १० ते १५ मिनिटांचे इम्प्रोव्हायझेशन, तालीम स्वरूपात सादर करावे लागेल. त्या प्राथमिक फेरीतून, अंतिम फेरीसाठी निवडलेल्या टीम्सना त्यांच्याच विषयावरील एकांकिका योग्य संहिता, आवश्यक नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा प्रकाशयोजना व पार्श्वसंगीतासह सादर करावी लागेल. 

अभिजीत पानसे, केदार शिंदे, सतीश राजवाडे व अभिराम भडकमकर या लेखक, दिग्दर्शकांनी स्पर्धेसाठी २० विषय दिले आहेत. यात मिस कॅाल, राम नाम सत्य है, आलिया भोगासी..., देवाशपथ खरं सांगेन, तू तेंव्हा तशी, ही वाट दूर जाते..., माझे मन तुझे झाले, सुख कळले, राजकारण? नको रे बाबा, माझा पक्ष... पितृपक्ष, एआय (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) आणि आम्ही, ⁠सिच्युएशनशिप (एक जोडपं नसलेल्या दोघांची, फ्रेंडशिप पलीकडली रिलेशनशिप), श्रद्धा सबुरी, संगीत मेरी आवाज सूनो  (संगीत व्यंगनाट्य), ⁠बॉर्डर (कोणत्याही बॉर्डवरचा दोन शत्रूंमधला मजेशीर संवाद) , आधुनिकतेच्या परिघावर, तुझे आहे तुजपाशी, आम्हास आम्ही पुन्हा पहावे, विरोध अंतर्विरोध, इन मिन तीन या विषयांचा समावेश आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ व ७ एप्रिल रोजी मुंबईत होईल. त्यातून निवडलेल्या एकांकिकांची अंतिम फेरी, ६ मे रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे घेतली जाईल. त्याच दिवशी अंतिम फेरीचा निकाल आणि रोख रक्कम व मानचिन्हे अशा पारितोषकांचे वितरणही केले जाईल.

टॅग्स :मुंबई