1 लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांनी विखे-पाटलांना पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 16:46 IST2018-12-31T16:44:57+5:302018-12-31T16:46:59+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांना नोटीस पाठवली आहे.

1 लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांनी विखे-पाटलांना पाठवली नोटीस
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांना नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वीच विखे-पाटलांनी मुंबईच्या विकास आराखड्यात मुख्यमंत्र्यांवर 1 लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना अवमानता नोटीस पाठवली आहे.
मुंबईच्या विकास आराखड्या(डीपी 2014-34)त बदल करून मुख्यमंत्र्यांनी 1 लाख कोटी रुपये लुबाडले आहेत. मोठ्या बिल्डरांना फायदा पोहोचवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी या विकास आराखड्यात बदल केला आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि बिल्डर यांच्यामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा सौदा झाला आहे. त्यातील 5 हजार कोटी रुपयांची रक्कम आधीच मुख्यमंत्री कार्यालयाला पोच झाली. मुख्यमंत्र्यांनी बिल्डरांच्या हितासाठीच विकास आराखड्यात बदल केला. तसेच बदललेला मुंबईचा विकास आराखडा पूर्वीसारखाच करावा अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशाराही विखे-पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे-पाटील बिनबुडाचे आरोप करत असल्याचं सांगत त्यांना अवमानता नोटीस पाठवणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणेच आज विखे-पाटलांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त अजोय मेहतांनीच बिल्डर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समझोता करून दिला होता. वांद्रे, गोरेगाव आणि मुलुंडसारख्या भागात बिल्डरांना फायदा पोहोचवण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यात बदल करण्यात आला आहे. पहिल्यांदा दोन इमारतींच्या मध्ये फायर ब्रिगेडची वाहनं जाण्यासाठी 9 मीटरचा रस्ता मोकळा सोडणं अनिवार्य होतं. आता त्यात बदल करून 6 मीटर करण्यात आलं आहे. एवढ्या कमी जागेतून फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी कशा पोहोचू शकणार आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास योजने(एसआरए)त 4 एफएसआय दिला जात होता. परंतु बिल्डरांच्या फायदा पोहोचवण्यासाठी त्या एफएसआयमध्येही वाढ करण्यात आल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला होता.