Join us  

मुंबईत फक्त १५४ खड्डे? अ‍ॅपवरील आकडेवारीवरुन महापालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 1:12 AM

महापालिकेच्या अ‍ॅपवर नोंदी : कुर्ला, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीमध्ये अधिक

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईकरांची पाणीकपातीमधून सुटका केली. मात्र त्यांची वाट बिकट केली आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश नागरिक घरातूनच काम करीत असल्याने त्यांना या खड्ड्यांचा त्रास सध्या जाणवत नाही. परंतु, गेले काही दिवस सतत बरसणाऱ्या पावसाने शेकडो खड्डे रस्त्यांवर पडले आहेत. कुर्ला, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड या विभागातून खड्ड्यांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. महापालिकेच्या अ‍ॅपवर आतापर्यंत ६८१ खड्ड्यांची नोंद झाली असून यापैकी केवळ १५४ शिल्लक असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबई यंदाही खड्ड्यात असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. गेल्या वर्षी १ जून ते १५ जुलै या कालावधीतच ११०० खड्ड्यांच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. यावेळेस जून ते २५ ऑगस्टपर्यंत पालिकेच्या अ‍ॅपवर ६८१ खड्ड्याच्या तक्रारी आल्या आहेत. यापैकी मंगळवारपर्यंत ५२७ खड्डे भरण्यात आले असून १५४ खड्डे शिल्लक असल्याचे या अ‍ॅपवर दिसून येते. मात्र प्रत्यक्षात मुंबईत हजारो खड्डे पडले असल्याची नाराजी काँग्रेस आणि भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरण्याचे मनसुबे विरोधी पक्षाने आखले आहेत.ते खड्डे आमचे नव्हे...महापालिकेकडे आतापर्यंत जेवढ्या खड्ड्यांच्या तक्रारी आल्या, ते तत्काळ बुजवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. मात्र सर्वाधिक खड्डे तर पश्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गावर दिसून येतील. हे रस्ते मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे सर्व दोष महापालिकेला देणे योग्य नाही, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.लॉकडाऊनमुळे जून, जुलै महिन्यात लोक रस्त्यावर कमी असल्याने खड्ड्यांच्या तक्रारी कमी दिसून येत आहेत. यावर्षी खड्ड्यांच्या तक्रारींसाठी असलेल्या अ‍ॅपची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमीच असणार. प्रत्यक्षात यावर्षीही मुंबई खड्ड्यात आहे. रस्त्यांसाठी असलेल्या निधीचा कुठे वापर झालेला दिसत नाही. मुंबईत २५ हजारपेक्षा कमी खड्डे नसतील. याचा जाब पालिका महासभेत प्रशासनाला विचारणार आहे. - रवी राजा, विरोधी पक्षनेते

वरळी भागातच पाहिले तर हजारो खड्डे रस्त्यांवर दिसतील. मुंबईकरांची फसवणूक केली जात आहे. प्रत्येक वर्षी मुंबईत मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. मात्र प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाला त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. - विनोद मिश्रा, भाजप नेते, मुंबई महापालिका

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाखड्डे