Join us  

तलावांमध्ये केवळ ७९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 1:38 AM

आतापर्यंत तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव भरून वाहू लागले आहेत. तसेच मध्य वैतरणा, भातसा तलाव लवकरच भरण्याच्या मार्गावर आहेत.

मुंबई : वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटण्यासाठी आता केवळ ७९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा तलावांमध्ये कमी आहे. सध्या तलाव क्षेत्रात १३ लाख ६८ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे. विशेष म्हणजे अवघ्या २० दिवसांमध्ये गत दोन वर्षांइतकाच जलसाठा आता तलावांमध्ये जमा आहे. त्यामुळे उर्वरित दहा टक्के पाणीकपात लवकरच रद्द होणार आहे.

२०१८मध्ये अपुऱ्या पावसामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना काही महिने करावा लागला होता. तीच वेळ पुन्हा यावर्षी येण्याची चिन्हे सुरुवातीला होती. जून महिन्यात पावसाने हजेरी लावली नाही. जुलै महिन्यातही पावसाचा जोर कमीच होता. त्यामुळे ५ आॅगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. परंतु, त्याच दिवशीपासून मुसळधार पावसाने मुंबईसह तलाव क्षेत्रात मुक्काम केला आहे.आतापर्यंत तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव भरून वाहू लागले आहेत. तसेच मध्य वैतरणा, भातसा तलाव लवकरच भरण्याच्या मार्गावर आहेत. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. पालिकेची आता केवळ दहा टक्के पाणीकपात सुरू आहे.

टॅग्स :पाणी