Join us

मुंबई भाजपतर्फे ३००हून अधिक ठिकाणी दांडिया, भोंडला, गरब्याचे आयोजन; आशिष शेलार यांची माहिती

By मनोहर कुंभेजकर | Published: October 17, 2023 1:12 PM

आशिष शेलार म्हणाले, गणेशोत्सव काळात मुंबईसह कोकणात भाजपाचा थेट सहभाग उत्सवात होता तोच माहोल आता नवरात्री उत्सवात दिसून येतो आहे.

मुंबई: मुंबईकरांच्या सुख दुःखात सहभागी होत मुंबईकरांची सेवा करणाऱ्या भाजपाने दहिहंडी, गणेशोत्सव आणि आता नवरात्री उत्सवातही बाजी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपतर्फे ३०० हून अधिक ठिकाणी दांडिया, भोंडला, गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुंबईकरांचे खास आकर्षण असलेला मराठी दांडिया उत्सव अभ्युदय नगर काळाचौकी येथे दि,१९ ते दि,२३ ऑक्टोबर या कालावधीत गायक अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे. पत्रकार परिषदेला मिहिर कोटेचा, संगीतकार अवधूत गुप्ते, गटनेते प्रभाकर शिंदे उपस्थित होते.

आशिष शेलार म्हणाले, गणेशोत्सव काळात मुंबईसह कोकणात भाजपाचा थेट सहभाग उत्सवात होता तोच माहोल आता नवरात्री उत्सवात दिसून येतो आहे. शहरासह उपनगरात नवरात्रीचा उत्साह असून सर्वत्र भाजपाचाच माहोल पहायला मिळतो आहे. यामध्ये अन्य कुठलाही पक्षाने दांडिया गरब्याचे आयोजन केलेले दिसून येत नाही. मुंबईत भाजप पुरस्कृत २०० थेट भाजपातर्फे १०० ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. तर भव्यदिव्य स्वरूपात १८ ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.  मराठीतील आघाडीचे संगीतकार, गायक अवधुत गुप्ते यांच्यासह त्यांची मराठमोळया कलावंताची टिम हे या दांडियाचे आकर्षण आहे. 

मुलुंड येथे खा. मनोज कोटक यांच्यातर्फे प्रेरणा रास २०२३ या दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. आ. सुनील राणे यांच्या पुढाकारात बोरीवलीत रंगरात्री दांडिया कार्यक्रम होत आहे. आ. प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून रंगरास नवरात्री २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. खा. गोपाळ शेट्टी आणि संतोष सिंग यांच्या माध्यमातून बोरिवलीत दांडिया होतो आहे. सुधिर शिंदे याच्या पुढाकाराने लोखंडवाला येथे कार्यक्रम होत आहे. माजी नगरसेवक विनोद शेलार यांच्या पुढाकाराने मालाड येथे दाडिंयाचे आयोजन करण्यात आले आहे. आ. अमित साटम यांच्यातर्फे जुहू येथे जेव्हीपीडी मैदानावर आदर्श नवरात्री उत्सव सुरू आहे. माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्या पुढाकाराने अंधेरीत "छोगाडा रे" दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. तर वांद्रे पश्चिम विधानसभेत सांताक्रुझ येथील छत्रपती संभाजीराजे मैदानातही आमदार आशिष शेलार यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख आकर्षण

या दांडियांमध्ये नामवंत कलावंत आणि नामवंत बॅन्ड हे तरुणांचे खास आकर्षण ठरत आहेत. ज्यामध्ये अंधेरी येथील दांडियात दांडिया क्वीन गीता रबारी, भूमी त्रिवेंदा तसेच मराठी दांडियात संगीतकार, गायक अवधूत गुप्ते, दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्यासह मराठी आणि हिंदीतील नामवंत कलावंताचा सहभाग हे आकर्षण ठरणार आहे. वांद्रे पश्चिम येथील दांडियामध्ये प्रसिध्द बँड हनिफ असलफ यांचे खास आकर्षण  ठरले आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, अजित पवार सरकारमध्ये आल्यानंतर ज्या काही घटना घडत आहेत त्यावरून मला.व्यक्तीगत असे वाटते त्या सगळ्यांमध्ये "तू मला सोडून गेलास मी तुला सोडणार नाही" असा वास येत आहे. कोण काय प्रतिक्रिया देते यापेक्षा सरकारचे काम कसे सुरू आहे हे महत्त्वाचे आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माहिती सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असंल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :नवरात्रीभाजपाआशीष शेलार