Join us

Pathan: काही लोकं शाहरुखवर जळतात, सुप्रिया सुळेंनी 'पठाण'बद्दल स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:25 PM

पठाण चित्रपटाला चाहत्यांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाने किंग खान भारावून गेला आहे

मुंबई - शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. खरेतर या चित्रपटाला सुरुवातीपासून कॉन्ट्रोव्हसीमध्ये अडकला होता. पठाणला विरोधाचा किंवा बॉयकॉट ट्रेंडचा काहीच परिणाम झालेला नाही. याउलट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत नवीन विक्रम रचत आहे. भारतात आतापर्यंत सिनेमाने २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे तर जगभरात पठाणने ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. पठाणवरुन झालेल्या वादावर शाहरुख खानने आपलं मत मांडलं. तर, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही स्पष्टपणे भूमिका घेत शाहरुख आणि दीपिक पदुकोनचं कौतुक केलं आहे. 

पठाण चित्रपटाला चाहत्यांकडून मिळालेल्या अफाट प्रेमाने किंग खान भारावून गेला आहे आणि पहिल्यांदाच पठाण चित्रपटाच्या टीमने मीडियाशी संवाद साधला. यावेळी चित्रपटाचे टीमने प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी शाहरुख खानने चित्रपटाच्या कॉन्ट्रोव्हर्सीवरदेखील प्रतिक्रिया दिली. तर, दुसरीकडे राजकीय वर्तुळातही पठाणच्या वादाची चर्चा आहे. त्यातूनच खासदार सुप्रिया सुळे यांना शाहरुख आणि पठाण सिनेमाबद्दल विचारणा केली असता, त्यांनी काही लोकं शाहरुखवर जळतात, अशा शब्दात आपलं मत व्यक्त केलं.  

सुप्रिया सुळे यांनी ‘Unfiltered By Samdish’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भातील भूमिका माडंली. “शाहरुख खान भारताचा सुपरस्टार आहे. तो त्या चित्रपटात (पठाण) अगदी चांगला दिसत आहे. तो व दीपिका एकत्र अगदी छान दिसत आहेत. मला असं वाटतं काही लोक शाहरुख खानवर जळतात.”, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. दरम्यान, मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रासारख्या राजकारण्यांनी ‘पठाण’ला केलेल्या विरोधाचं तुम्ही समर्थन करता का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी नकार दिला. 

“अजिबात नाही. मी या गोष्टींना पाठिंबा देत नाही. मी अशावेळी त्या व्यक्तींना फोन करेन. त्यांना विचारेन की, भाऊ तुला काय झालं आहे?. पण, मुळात आपण अशा विषयांवर चर्चा का करतो? अरुण जेटली म्हणायचे, तुम्ही दाखवणं बंद केलं तर लोक बोलणं बंद करतील. कधी कधी मला अरुणजी यांचं हे वाक्य पटतं, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी पठाण आणि शाहरुखबद्दल दिली. 

पठाणच्या वादावर काय म्हणाला शाहरुख

पठाण चित्रपटाचे नाव आणि 'बेशरम रंग' या गाण्यावरून देशातून विरोध झाला होता. मात्र संपूर्ण स्टारकास्टने यावर कधीच कोणतेच स्टेटमेंट दिले नाही. आजही शाहरुख खानने कोणाचेही नाव घेतले नाही तर आपले म्हणणे मांडले. तो प्रत्येक धर्मासाठी सिनेमा बनवतो असेही शाहरुख म्हणाला. तो म्हणाला, “मी सांगू इच्छितो की, कोणीही चित्रपट बनवतो, मग तो कोणत्याही भाषेत बनवला जात असला, तरी आपल्या पात्रांनी लोकांना खूश करणे हाच सर्वांचा उद्देश असतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही. आम्ही अमर (दीपिका), अकबर (शाहरुख), अँथोनी (जॉन) आहोत, आम्ही प्रत्येक वर्गाच्या, समाजाच्या, धर्माच्या लोकांसाठी प्रेम आणि आनंद पसरवण्यासाठी चित्रपट बनवतो, हाच 'पठाण'चा अर्थ आहे. 

टॅग्स :सुप्रिया सुळेशाहरुख खानपठाण सिनेमाराजकारण