Join us  

रिव्हॅल्युएशनचे निकाल प्रलंबित, विद्यापीठाचे तोंडावर बोट; म्हणे, त्यामुळेच पुढील वर्गात प्रवेश देणे उचित नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 3:11 PM

...मात्र, त्याचवेळी पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचे निकाल प्रलंबित का ठेवले आहेत, याबाबत विद्यापीठाने मिठाची गुळणी धरणेच पसंत केले आहे. 

मुंबई : पुनर्मूल्यांकनाचा निकाल रखडल्याने इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे उचित होणार नाही, असे विद्वत परिषदेत एकमताने ठरल्याने विद्यार्थ्यांना दिलासा नाकारल्याचे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाने दिले आहे. मात्र, त्याचवेळी पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचे निकाल प्रलंबित का ठेवले आहेत, याबाबत विद्यापीठाने मिठाची गुळणी धरणेच पसंत केले आहे. 

‘लोकमत’ने १७ मे रोजीच्या अंकात ‘रिव्हॅल्युएशनचा निकाल रखडल्याने तीन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर खुलासा करताना हा प्रश्न ३००० नव्हे, तर १२०० ते १३०० विद्यार्थ्यांचा असल्याचा दावा विद्यापीठाने केला. विद्यापीठाच्या पदवीचे व्यावसायिक क्षेत्रातील विशेष महत्त्व अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही विद्यापीठाने म्हटले आहे. या संबंधात कळीचा मुद्दा असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकाल कधीपर्यंत अपेक्षित आहेत, याचे उत्तर विद्यापीठाकडे नाही. उलट विद्यापीठाने निकाल वेळेत लावण्यात आलेल्या अपयशाचे खापर विद्यार्थ्यांवरच फोडले आहे.

तासिका वाढवल्या२०२२-२३च्या या बॅचचे प्रवेश विलंबाने झाले असले, तरी १५ आठवड्यांचे शैक्षणिक सत्र दर आठवड्यात ५ दिवसांऐवजी ६ दिवस कामकाज चालवून आणि रोजचा कालावधी एक तासाने वाढवून १३ ते १४ आठवड्यांमध्ये पूर्ण केल्याचा विद्यापीठाचा दावा आहे.

विद्यापीठ म्हणते...मुलांचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी विविध संघटनाकडे व माध्यमाकडे जातात व अर्धवट व चुकीची माहिती देऊन सर्वांची दिशाभूल करतात.११पैकी ५ थिअरी पेपर उत्तीर्ण होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ अभ्यास आणि आवश्यक व्यावसायिक स्किल अवगत करण्यात गुंतवावा. 

टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यार्थी