मुंबई - देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रातही या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, त्यासोबतच त्यांच्या संलग्नित ६ संघटनांवरही बदीची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
पीएफआय संघटनेवर केरळ सरकारने सर्वप्रथम बंदी घातली होती. पीएफआयच्या माध्यमातून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत होता. मागच्या काळात महाराष्ट्रातही नॉर्थईस्ट भागात कुठेतरी मशिदी फोडल्याने वातावरण संतप्त करण्यात आले, त्यातून अमरावतीमध्ये मोर्चे काढण्यात आले. तोडफोड करण्यात आली होती. ज्याचा कुठलाही संबंध मशिदी तोडल्याशी नव्हता. त्याचे क्रिएटीव्ह हे बांग्लादेशचे होते, जे वेगवेगळ्या देशातले होते. अशी कृत्ये पीएफआयच्या माध्यमातून सुरू होते.
फंडिंग्सचे मॉडेलही बनवले.
पीएफआयद्वारे फंडींगचे मॉडेल्सही तयार करण्यात आले होते. खूप अकाऊंट्स ओपन करायचे, या अकाऊंटमधून थोडा-थोडा पैसा आणायचा म्हणजे कोणाच्या लक्षातही येणार नाही, या सगळ्या गोष्टीचे पुरावे उपलब्ध आहेत. म्हणूनच केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली असून महाराष्ट्रातही आम्ही सक्षम कारवाई करू, तसेच त्यांच्याशी संबंधित ६ संघटनांवरही बंदी घालण्याची कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
पीएफआय सायलेंट किलर
पीएफआय एक सायलेंट किलर होता, ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपली आर्मी आणि इंटेलिजन्स अलर्ट झालं आहे. त्यामुळे, थेट दहशवादी हल्ला करणं किंवा बॉम्बस्फोट करणं, याऐवजी अशी वेगळ्यापद्धतीने समोर एक मानवी चेहरा दाखवून पाठीमागे हवे ते कृत्य करायचे असे काम देशविघात शक्तींनी सुरु केल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.