Join us

बेस्टच्या बळकटीसाठी आराखडा तयार करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 7:12 AM

श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या विकासात बेस्ट उपक्रमाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी बेस्ट ला बळकट करणे आवश्यक असून यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट प्रशासनाला केली.

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, कोविड भत्ता, कायमस्वरुपी तसेच हंगामी स्वरुपातील कामगारांना नेमणूक पत्र आदींच्या माध्यमातून न्याय दिल्याबद्दल श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार ॲड. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष प्रसाद लाड, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी बेस्ट कामगारांच्या ग्रॅच्युइटीसाठी ३३२ कोटींचा तसेच कोविड भत्त्यापोटीचा ७८ कोटींचा धनादेश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.

मुंबईने १८७३ मधील ट्राम सेवेपासून आजच्या बेस्ट बसपर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे परिवर्तन पाहिले आहे. मुंबईकरांना त्यांच्या गंतव्यस्थानाच्या जवळ पोहोचण्यासाठी एकाहून अधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याने आता मेट्रोचे जाळे देखील विणले जात आहे. तथापि, बेस्ट सेवेचे महत्त्व अबाधित असून तिला अधिक बळकट केले जाईल, असे फडणवीस म्हणाले. बेस्ट कामगारांच्या जुन्या झालेल्या निवासी संकुलांच्या पुनर्विकासाबाबत तसेच बेस्टच्या बळकटीकरणाला मदत होईल, अशा पद्धतीने बस डेपोच्या पुनर्विकासाबाबत देखील आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. 

टॅग्स :बेस्ट