Join us

पंतप्रधान मोदी खूप दिलदार, गुजरातला १ हजार कोटी दिले; महाराष्ट्राला १५०० कोटी देतील: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 9:04 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १ हजार कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र आणि गोव्यातही वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १ हजार कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र आणि गोव्यातही वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला १५०० कोटींची मदत दिली पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

"पंतप्रधान मोदींचे संपूर्ण देशात लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला तौत्के चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी १५०० कोटींची मदत देतील. ते खूप दिलदार आहेत", असं संजय राऊत म्हणाले. 

"पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल अशी आशा मी करतो", असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला. महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे १५०० आणि ५०० कोटींची मदत द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हेदेखील शुक्रवारी कोकणाचा दौरा झाल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :संजय राऊततौत्के चक्रीवादळनरेंद्र मोदी