Join us  

पोलिसांनी उतरविली ५६५ तळीरामांची धुंदी

By admin | Published: January 02, 2017 6:48 AM

नववर्षाच्या स्वागतानिमित्त दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या ५६५ तळीरामांची धुंदी मुंबई पोलिसांनी उतरविली आहे. तर बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न घालता मोटारसायकल

मुंबई : नववर्षाच्या स्वागतानिमित्त दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या ५६५ तळीरामांची धुंदी मुंबई पोलिसांनी उतरविली आहे. तर बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न घालता मोटारसायकल चालविणाऱ्या तब्बल २२० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.शनिवार सायंकाळपासून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत शहर व उपनगर परिसरात ठिकठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नववर्षाच्या स्वागतावेळी हुल्लडबाज व मद्यपीकडून कसलाही अनुचित प्रकार, अपघात घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी कडक बंदोबस्ताचे नियोजन केले होते. त्यामुळे वेगाने वाहन चालविणे, हुल्लडबाजांना वेळीच प्रतिबंध घालता आला. त्यामुळे एकही अनुचित प्रकार घडल्याची घटना पुुढे आलेली नाही.स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी केली होती. या वेळी केलेल्या तपासणीमध्ये दारू पिऊन चालविणाऱ्या ५६५ जणांवर कारवाई करण्यात आली, तर वेगाने गाडी चालविणाऱ्या १३ जणांना पकडण्यात आले. हेल्मेट न घालता मोटारसायकल चालविणाऱ्या २०७ युवकांवर कारवाई करण्यात आली. तर नो पार्किंगच्या जागी वाहन लावणाऱ्या ६९२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. काहींना घटनास्थळी दंड आकारण्यात आला, तर काहींचे लायसन्स व कागदपत्रे जप्त करून त्यांना रविवारी सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)