Join us  

पोलिसांनी गैरवर्तणूक केली

By admin | Published: January 06, 2016 1:46 AM

बॉयफ्रेंडच्या घरी आलेल्या पोलिसांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार ‘बालिका वधू’ मालिकेतील अभिनेत्री व मॉडेल प्रत्युषा बॅनर्जी हिने कांदिवली पोलीस ठाण्यात दिली आहे

मुंबई : बॉयफ्रेंडच्या घरी आलेल्या पोलिसांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार ‘बालिका वधू’ मालिकेतील अभिनेत्री व मॉडेल प्रत्युषा बॅनर्जी हिने कांदिवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी पोलिसांनी मात्र असला काही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे.प्रत्युषाच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या खासगी बॅँक कर्मचाऱ्याशी झालेल्या वादातून सोमवारी हे प्रकरण घडले होते. प्रत्युषाने एका खासगी बँकेतून कार घेण्यासाठी कर्ज घेतले होते. त्याचा हफ्ता न भरल्याने दोन दिवसांपूर्वी वसुली कर्मचारी अमित दळवी तिच्या घरी गेला होता. त्या वेळी तिचा बॉयफ्रेंड राहुल सिंगने त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली होती. त्याबाबत त्याने कांदिवली पोलिसात तक्रार दिल्यानंतर राहुलविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. सोमवारी दळवीने पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन राहुल सिंगला समज देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, कांदिवली पोलीस ठाण्यातील दोघे कर्मचारी त्याला आणण्यासाठी त्याच्या घरी गेले. मात्र, राहुल घरी नसल्याने त्याच्या आईकडे निरोप देऊन परत जात होते. त्याचवेळी प्रत्युषा तिथे आलेल्या पोलिसांबरोबर वाद घालू लागल्याने ते तिथून निघून आले. मात्र, त्यानंतर प्रत्युषाने कांदिवली पोलीस ठाण्यात येऊन घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याचा आरोप केला. मात्र, संबंधित पोलिसांनी असा काही प्रकार घडला नसल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे फिर्यादीनुसार अनोळखी व्यक्तीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, चौकशी करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले.