मुंबई : वीज ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना ग्राहकाभिमुख सेवा प्रदान करणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी जनजागृतीवर भर देणे काळाची गरज आहे, असे मत मुंबई परिक्षेत्राचे विद्युत लोकपाल आर.डी. संखे यांनी व्यक्त केले.विद्युत लोकपाल आपल्या दारी या उपक्रमांतर्गत त्यांनी गुरुवारी महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळास भेट दिली; याप्रसंगी संखे बोलत होते. ते म्हणाले, महावितरणची राज्यभरातील एकूण ग्राहक संख्या लक्षात घेता समस्या घेऊन येणाऱ्या ग्राहकांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे विजेच्या विविध तक्रारी संदर्भातील अडचणी सोडवण्याकरिता ग्राहक तक्रार निवारण मंचाची मदत वीज ग्राहकांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी त्यांनी महावितरणच्या कॉल सेंटरशिवाय तत्काळ दोष शोधणाऱ्या स्काडा सेंटरची पाहणी केली. भांडुपमधील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. ठाण्यातील टिसा या औद्योगिक संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. सरतेशेवटी त्यांनी महावितरणकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा लक्षात घेतल्या.
‘ग्राहकाभिमुख सेवा प्रदान करा’
By admin | Published: October 09, 2015 3:26 AM