Join us  

वीस वर्षांसाठी विम्याची तरतूद; कोस्टल रोडचा मुहूर्त कधी निघणार?

By सचिन लुंगसे | Published: September 12, 2022 8:58 AM

सागरी किनारा मार्गाचा भाग असणारे महाबोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या चौपाटीपर्यंत असणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते वाहतुकीला आयाम देण्यासाठी विविध प्राधिकरणांकडून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असून, यापैकी एक असलेल्या सागरी किनारा मार्गाचे (कोस्टल रोड) काम मुंबई महापालिकेकडून जात आहे. श्यामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल (प्रिन्स स्ट्रीट फ्लाय ओव्हर) ते वरळी या दरम्यान १०.५८ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत ७० टक्क्यांची बचत होईल. शिवाय ३० टक्के इंधन बचत साध्य होणार आहे. यामुळे पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे. आजपर्यंत प्रकल्पाचे ५३ टक्क्यांहून अधिक काम झाले असून, सागरी किनारी रस्ता प्रकल्प नोव्हेंबर २०२३पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे.

ऑक्टोबर २०१८पासून श्यामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रिट) उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे वरळी सागरी सेतू)च्या वरळी टोकापर्यंत मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाचे काम सुरू आहे. एकूण तीन पॅकेजमध्ये हा प्रकल्प विभागला आहे. पॅकेज ४ अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपूल ते प्रियदर्शिनी पार्क हे ४.०५ किलोमीटर अंतर, पॅकेज १ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस हे ३.८२ किलोमीटर अंतर आणि पॅकेज २ मध्ये बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक असे २.७१ किलोमीटर अंतर याप्रमाणे कामाची विभागणी करण्यात आली आहे.

सागरी किनारा मार्गाचा भाग असणारे महाबोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या चौपाटीपर्यंत असणार आहेत. ते मलबार हिलच्या खालून जाणार आहेत. दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर खोलीवर करण्यात येत आहे. बोगदे खणण्यासाठी टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येत असून, या यंत्रांचे नाव मावळा आहे. हे यंत्र ४ मजली इमारती एवढे उंच आहे. ११ जानेवारी २०२१ रोजी मावळा या यंत्राने बोगदा खणण्याचे काम सुरू केले. पहिल्या बोगद्याचे खोदकाम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले. १ एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू झाले. ११९ दिवसात १ हजार मीटरचा टप्पा गाठण्यात आला. २९ जुलै रोजी प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला. या प्रकल्पांतर्गत दोन महाबोगदे खणण्यात येत आहेत. दोन बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम याच वर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण झाले, तर दुसऱ्या बोगद्याचे १ हजार मीटरचे खोदकाम २९ जुलै रोजी पूर्ण झाले.

वीस वर्षांसाठी विम्याची तरतूदप्रकल्पांतर्गत समुद्रातील दोन खांबांतील अंतर ६० मीटर हे पुरेसे असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेने दिला आहे. खाबांभोवती प्रतिबंधक कवच (फेंडर) बसविले जाणार आहेत. खांबावर बोट आदळून अपघात झाल्यास पुढील वीस वर्षांसाठी विम्याची तरतूद आहे. दरम्यान, वरळी येथील क्लिव्हलँड जेटीमधून मच्छीमारांच्या बोटींना ये-जा करण्यासाठी दोन पिलरमधील अंतर ६० ऐवजी २०० मीटर ठेवण्याची मागणी मच्छीमारांकडून करण्यात आली होती.