Join us  

पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ? 

By जयंत होवाळ | Published: June 06, 2024 8:44 PM

या कामांसाठी थेट नळाचे  पाणी वापरले जाते. 

मुंबई :  धरणातील आटलेला पाणी साठा   लक्षात घेता पाण्याची बचत करण्याकरिता मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्याचबरोबर मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र या आवाहनाला मुंबईकरांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा  विचार पालिका प्रशासन करत आहे. रस्त्यावर गाड्य धुणे, व्हरांडे धुणे, जिन्याच्या पायऱ्या धुणे या प्रकारांमुळे पाण्याची मोठी नासाडी होत असते. या कामांसाठी थेट नळाचे  पाणी वापरले जाते. 

पावसाळा अजून सुरु झाला नसल्याने आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याची पालिकेची भूमिका आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार सुरु आहे. दिल्ली शहरात पाईपने गाड्य धुण्यास तूर्तास बंदी घालण्यात आली आहे. त्या धर्तीवर पालिका प्रशासन कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. पाण्याची बचत करण्यासाठी पालिकेने टप्प्याटप्प्याने पाणी कपात लागू केली आहे. सुरुवातीला पाच टक्के आणि नंतर १० टक्के असे कपातीचे स्वरूप आहे. पाण्याची नासाडी टाळून आणखी बचत करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम आठ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर पालिका प्रशासनाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. पाणी बचत करण्यासाठी यापूर्वीच पालिकेने मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. गाड्या , कॉमन गॅलेऱ्या , जिने सरसकट पाण्याने न धुता ओल्या कपड्याने पुसून घ्या, भांडी नळाखाली न धुता पातेल्यात पाणी घेऊन  धुवा, अशा सूचना करण्यात आपल्या आहेत.

टॅग्स :महाराष्ट्र