Join us  

गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ९२० विशेष गाड्या चालवणार; 'या' स्थानकांवरून सुटणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:34 AM

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नियमित गाड्यांव्यतिरिक्त ९२० गाड्या चालविणार असून, आजपर्यंत ८२२ गाड्या चालविण्यात आल्या आहेत. याद्वारे १०.८९ लाख प्रवासी प्रवास करतील, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. या गाड्यांत पूर्ण वातानुकूलित विशेष, अनारक्षित विशेष आणि वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, नागपूर, पुणे आणि सोलापूर येथून दानापूर, गोरखपूर, वाराणसी, बनारस, प्रयागराज, समस्तीपूर, करीमनगर, मऊ, आगरतळा, आसनसोल, थिविम, कोचुवेली या स्थळांसाठी हे नियोजन आहे. 

९२० विशेष गाड्यांपैकी ३५३ सेवा उत्तर प्रदेशसाठी, त्यानंतर २०५ सेवा बिहार, ८४ सेवा गोवा, ३६ सेवा ईशान्य, ७४ सेवा महाराष्ट्रात आणि १६८ सेवा केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा व राजस्थानसाठी  आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, सोलापूर, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, नागपूर या प्रमुख स्थानकांवर  गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन केले जात आहे.

टॅग्स :रेल्वे प्रवासीरेल्वेप्रवासी