दोन दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:36 IST2024-12-26T10:36:35+5:302024-12-26T10:36:47+5:30
मुंबई : हवामान खात्याकडून येत्या २७ आणि २८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा ...

दोन दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात शक्यता
मुंबई : हवामान खात्याकडून येत्या २७ आणि २८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
येत्या शुक्रवारी दुपारपासून नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांत मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात होईल. रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता असून, विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणे वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान राहिल, तसेच सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी स्थितीनुसार नियोजन करावे
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन विभागाने केले असून प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.