Join us  

NDA की INDIA कोणासोबत जाणार? राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “आम्ही आता...” 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 9:10 PM

Raju Shetti on NDA And INDIA Meeting: NDA किंवा INDIA कोणाकडूनच निमंत्रण आले नाही म्हणून गेला नाहीत का, यावर राजू शेट्टींनी थेट शब्दांत उत्तर दिले.

Raju Shetti on NDA And INDIA Meeting: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधक INIDA यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळाले. भाजपविरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरूत पार पडली तर, विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA ची एक बैठक दिल्लीत झाली. या दोन्ही बैठकांना दिग्गज राजकारण्यांनी हजेरी लावली. देशभरातील ३८ पक्ष एनडीएसोबत असून, २६ पक्षांनी विरोधी गट इंडियाला पाठिंबा दिला. या बैठकांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. 

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गायरान जमीनीवरील बांधण्यात आलेल्या घरामधील हजारो गोरगरीब कुटूंबाचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आझाद मैदान येथून विधानभवनावर काढण्यात आला. यावेळी हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. आझाद मैदान येथून मोर्चास सुरुवात झाल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने शासनाकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळास विधानभवनामध्ये चर्चेसाठी निमंत्रित केले. या बैठकीनंतर राजू शेट्टी यांना एनडीए आणि इंडिया बैठकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. 

NDA की INDIA कोणासोबत जाणार? 

NDA आणि INDIA यापैकी कोणत्याही बैठकीला उपस्थित नसल्याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्ष कोणत्याच आघाडीत सामील नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिअधिग्रहण, ऊसाची किमान आधारभूत किंमत याबाबतची धोरणे किमान समान कार्यक्रमापेक्षा भिन्न होती. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आम्ही कोणत्याही आघाडीत गेलो नाही. एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. फारवर्षांपूर्वी आम्ही एनडीएशी असलेले संबंध तोडून टाकले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा स्वाभिमानी पक्ष कोणत्याही आघाडीचा घटक नाही, असे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, निमंत्रण आले नाही म्हणून गेलो नाही, असा प्रश्न नाही. कारण आमचीच जायची इच्छा नाही. कारण सध्याच्या राजकारणात विरोधी पक्षही जबाबदारीने वागताना दिसत नाही. जे सत्तेत आहे, त्यांनी तर कंबरेचे डोक्याला गुंडाळलेले आहे, अशी सडकून टीका करत, आम्हाला या सगळ्यांत रस नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.  

टॅग्स :राजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटना