Join us  

Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीच्या ३ मतांवर भाजपाचा आक्षेप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 2:11 PM

स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र भाजपाने घेतलेला आक्षेप फेटाळून लावला आहे. 

मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत २८५ पैकी २३८ आमदारांनी मतदारांनी हक्क बजावला आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. ३ तासात २३८ आमदारांनी मत दिलं. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

एक-एक मत प्रत्येक पक्षासाठी महत्वाचं झालं आहे. तसंच आपण केलेलं मतदान अवैध ठरणार नाही आणि पक्षावर नामुष्की ओढवणार नाही, याचीही काळजी आमदारांनी घेतली आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतावर भाजपाचे नेते आशिष शेलार आणि नेते पराग अळवणी यांनी आक्षेप घेतला होता. मात्र स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपाने घेतलेला आक्षेप फेटाळून लावला आहे. 

आदित्य ठाकरेंचं मत अवैध ठरता ठरता वाचलं! ऐनवेळी घोळ लक्षात आला अन्...; नेमकं काय घडलं वाचा...

पराग अळवणी झालेल्या प्रकरणाबाबत म्हणाले की, मी स्वतः केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पोलिंग एजंट या नात्याने यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानाबद्द्ल आक्षेप घेतला आहे. मतदान करतांना प्रत्येक पक्षाच्या मतदाराने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीला एका अंतरावरुन मतपत्रिका दाखवायची असते, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. याबाबात आक्षेप आम्ही नोंदवला, अशी माहिती पराग अळवणी यांनी दिली. 

स्वतःच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवायची असते मात्र कांदे यांनी स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला दिसेल अशी मतपत्रिका दाखवली, या कृतीमुळे हे मत बाद होतं.व्हिडिओ शुटिंग झालेलं आहे, नियमांचा भंग झालेला आहे, ही ३ मतं बाद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असं पराग अळवणी म्हणाले. तसेच सदर प्रकणाबाबत भाजपा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भाजपाच्या या मागणीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे लोक घाबरले आहेत. त्यांच्या आक्षेपांकडे मी लक्ष देत नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच पराभव दिसत असल्याने भाजपाकडून असा डाव खेळला जात असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता-

मंत्री आदित्य ठाकरे यांनी मतदान करताना त्यांच्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची पहिली मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना दुसरी मतपत्रिका दिली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या मतपत्रिकेवर शिक्का का नव्हता, याचा तपास निवडणूक अधिकारी करणार आहेत. 

टॅग्स :राज्यसभाशिवसेनाभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारजितेंद्र आव्हाड