Join us

Rajyasabha : शरद पवारांवर मुख्यमंत्री नाराज नाहीत, संजय राऊतांनी सांगितलं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 10:43 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीवरुन राजी-नाराजीचे दावे फेटाळले आहेत

मुंबई : राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून भाजपने धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या मतांचा कोटा अचानक वाढवल्याने शिवसेनेचा उमेदवार अडचणीत आल्याची चर्चा सकाळपासून रंगली आहे. राष्ट्रवादीच्या या डावपेचामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांवर नाराज असल्याची चर्चाही सुरू आहे. मात्र, संजय राऊत यांनी हा दावा फेटाळला आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीवरुन राजी-नाराजीचे दावे फेटाळले आहेत. तसेच, भाजपकडूनच चुकीच्या बातम्या माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात पसरवल्या जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. ज्यांचा जेवढा कोटा बैठकीत ठरला आहे, त्याप्रमाणे मतदान होणार आहे. गणित पूर्णपणे जुळवलेले आहेत. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवारांशी चर्चा केली. प्रत्येक पक्ष एकमेकांना मदतच करतायंत. खेळीमेळीने निवडणूक लढवली जात आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेस-राष्ट्रवादीने मतदानाचा कोटा वाढवला

धोका नको म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानाचा कोटा वाढवल्याची महिती समोर आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेना उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मतं कमी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची चिंता वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु होण्याच्या अवघे काही तास आधी एमआयएम पक्षाने आपली भूमिका जाहीर करत महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना, एमआयएमशी मतभेद असले तरी महाविकास आघाडीला मतदान करणार असतील तर आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे. 

भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान

पाठिंबा मागायचाच असेल, तर तो उघडपणे मागा. आमच्या मतदारसंघातील विकासकामं होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली होती. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे दोन्ही आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात जलील यांनी ट्विट केले असून, भाजपचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.  

टॅग्स :शरद पवारसंजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसमुख्यमंत्री