मुंबई : ओला, उबर व रॅपिडोसारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या या संदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच शासकीय नियमावली अंतर्गत आणण्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी आदी उपस्थित होते.
रोजगार निर्माण करण्यावर भर- प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्याबरोबरच सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांतर्गत चारचाकी, बाइक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे. - बाईक चालविण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावे, जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल, यावर भर द्यावा, अशा सूचनाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत दिल्या. - खासगी वाहतूक व्यवस्था, सुस्थितीत असलेली वाहने, प्रवाशांची सुरक्षा, हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा, तत्पर सेवा इत्यादी बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले.