Join us  

रिक्षा बंदमुळे मुंबईकर वेठीस

By admin | Published: February 16, 2016 3:06 AM

रेल्वे स्थानक, शाळा, कॉलेज किंवा कार्यालय गाठण्यासाठी नेहमी दिमतीला असणारी रिक्षा बंद असल्याचा फटका सोमवारी उपनगरवासीयांना बसला.

मुंबई : रेल्वे स्थानक, शाळा, कॉलेज किंवा कार्यालय गाठण्यासाठी नेहमी दिमतीला असणारी रिक्षा बंद असल्याचा फटका सोमवारी उपनगरवासीयांना बसला. विविध मागण्यांसाठी रिक्षा युनियनकडून रिक्षा बंदचे आंदोलन पुकारण्यात आल्याने मुंबईकर अक्षरश: वेठीस धरले गेले. मात्र बेस्ट आणि खासगी वाहनांनी आधार दिल्याने थोडाफार दिलासा प्रवाशांना मिळाला. मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून सोमवारी रिक्षा बंदची हाक देण्यात आली होती. संपाची तीव्रता कमी करण्यासाठी परिवहनने खासगी बस आणि कारमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली होती. मुलुंड ते कुर्ला आणि वांद्रे ते बोरीवलीपर्यंतच्या बऱ्याच भागात रिक्षाचालक बंदमध्ये सामील झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे स्थानकांबाहेर तर रिक्षाच नसल्याने बस स्टॉपवर गर्दी होत होती. तिथे लांबलचक रांगा लागल्या होत्या. पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग, एस. व्ही. रोड, लिंक रोड येथे रिक्षा नसल्याने वाहतूककोेंडी कमी झाली. खासगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आल्याने त्याचा फायदा खासगी बसचालकांनी उचलला. खासगी बसमधून प्रवाशांची वाहतूक करण्याची मुभा देण्यात आल्याने मालाड, कांदिवली आणि बोरीवलीत नगरसेवकांकडून मोफत बस सेवा देण्यात आली. नगरसेवक शिवा शेट्टी यांनी गोराई ते बोरीवली रेल्वे स्थानकापर्यंत एका खासगी बसची व्यवस्था केली होती. ही सेवा सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा आणि सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत चालविली गेली. मार्वे रोड परिसर तसेच मालाड पूर्वेच्या आप्पापाडा, त्रिवेणीनगर, संतोषनगर, पठाणवाडीसारख्या भागातही रिक्षा बंद होत्या. त्यामुळे या भागातील स्थानिकांना बेस्ट बसचाच पर्याय राहिला होता.मुंबई : रिक्षाचालकांनी सोमवारी पुकारलेल्या संपात प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून बेस्ट प्रशासनाने रस्त्यांवर जादा गाड्या उतरवल्या, त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र बसमध्येही प्रचंड गर्दी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्यांसाठीही बेस्टने जादा गाड्या सोडल्या होत्या. परंतु प्रवाशांवर बसच्या दरवाजांना लटकून प्रवास करण्याची वेळ आली.बेस्ट प्रशासनाकडून मुंबई आणि उपनगरांत दिवसभरात ८९ जादा गाड्या चालवण्यात आल्या. शिवाय इतर बसमार्गांवर ९८ बस वळवण्यात आल्या होत्या, परंतु रिक्षांचा संप असल्याने बेस्टवर प्रवाशांचा भार पडला. लाल बहादूर शास्त्री मार्गावरून सांताक्रूझ पूर्वेला जाणाऱ्या बेस्टगाड्यांनाही तुफान गर्दी होती. सायनहून बॅलार्ड पियरकडे जाणाऱ्या ६६ क्रमांकाच्या बसगाड्याही गर्दीने भरून गेल्या होत्या. लांब पल्ल्याचा गाड्यांना फारशी गर्दी नव्हती. कुर्ला, घाटकोपर स्थानकांहून अंधेरी, बोरीवली, सांताक्रूझला जाणाऱ्या बसमध्ये अधिक गर्दी होती. जंक्शन परिसर वगळता फार वाहतूककोंडी नव्हती. (प्रतिनिधी)१ओला, उबरसह काही टॅक्सी कंपन्या अवैधपणे प्रवासी वाहतूक करत असून त्यावर शासनाकडून निर्बंध घालण्यात यावेत.२मुंबईकरांना सेवा देण्याकरिता आॅटोरिक्षांच्या नवीन एक लाख परवान्यांचे वितरण त्वरित करावे३रिक्षाचालक-मालकांना पब्लिक सर्व्हण्टचा दर्जा मिळाला पाहिजे४रिक्षाचालक-मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना विनाविलंब करण्यात यावी.५रिक्षाचालक-मालकांना कमी दरात घरे उपलब्ध करून द्या.६तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लायसन्स धारण करणाऱ्या रिक्षाचालकांना त्वरित बॅज द्या.७नूतनीकरण केलेल्या परवान्यांकरिता अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली मुंबई महानगर क्षेत्रातील विजेता आॅटोरिक्षा चालकांसाठी पंधरा हजार आणि अन्य विभागासांठी असलेली दहा हजार भरण्याची अट रद्द करावी.