Join us

नद्यांचा जीव गुदमरलेला! प्लास्टीकचा कचरा जैसे थे, तलावांच्या पुनरुज्जीवनाकडेही दुर्लक्ष

By सचिन लुंगसे | Published: June 21, 2023 11:36 AM

पवई तलावाची वहन क्षमता मर्यादेपलीकडे कमी झाली आहे. कारण त्याचे पुनरूज्जीवन करण्यासाठी वेळेवर पावले उचलण्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.

मुंबई : मुंबईतून वाहणाऱ्या दहिसर, पोईसर, ओशिवरा, वालभट आणि मिठी नद्यांच्या संवर्धनासाठी सरकार दरबारी ‘चला जाणू या नदी’ला हा उपक्रम हाती घेण्यात आला असला तरी आजही नद्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्यासह प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही. जलप्रदूषणाचा प्रश्न आवासून उभा असतानाच दुसरीकडे, महापालिका प्रशासन जलसंवर्धनासाठी पुरेसे प्रयत्न करत नाही. जलतज्ज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजनांना गांभीर्याने घेतल्या आणि पवई, विहार आणि तुळशी तलावांच्या पुनर्जीवनासाठी पावले उचलली तर प्रदूषणमुक्तीचे ध्येय यशस्वी होईल. मात्र, प्रशासकीय यंत्रणेत पुरेसा ताळमेळ नसल्याने प्रदूषणमुक्त नदी हे दिवास्वप्नच राहिले आहे.

पाण्याचे नमुने घेतले पवई तलाव २५७ एकर क्षेत्रात पसरलेला आहे. त्याचा प्रवाह मरोळ, साकीनाका येथील मिठी नदीच्या रुपात आहे. त्याचे पाणी गोरेगाव, आरे कॉलनीमध्ये गुरांसाठी पुरविण्यासाठी वापरले जाते. पवई तलावाची वहन क्षमता मर्यादेपलीकडे कमी झाली आहे. कारण त्याचे पुनरूज्जीवन करण्यासाठी वेळेवर पावले उचलण्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. तलावाच्या सर्व सीमांवर गाळ आहे. पाणलोट क्षेत्रात अतिक्रमण होत आहे. प्रदूषणाच्या गंभीर समस्यांमध्ये भर पडली आहे. आता तलाव आणि मिठी नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. पाण्याचे प्रदूषण जलचरांना धोका निर्माण करत आहे.

 डॉ. स्नेहल दोंदे यांनी महापालिकेच्या एच / पूर्व वॉर्ड कार्यालयाला भेट दिली. त्यांनी तिथल्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट विभागाचे पर्यवेक्षक प्रवीण कांबळी व कनिष्ठ अधिकारी अल्पेश बागकर यांच्यासोबत मिठी नदीची पाहणी केली. माहीम व वांद्रे या ठिकाणी मिठी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा दिसून आला. कापडदेखील या कचऱ्यामध्ये होते. साफ केले तरी कचरा हा येतच राहतो. कुणी कचरा नदीत टाकते. कचरा हा समुद्र दिशेनेही येतो. नदीच्या जवळ पुरापासून वाचविण्यासाठी जी छोटीशी भिंत बांधली आहे त्यावरही भरपूर कचरा साचलेला असतो. मासे कमी झाले की जाळ्यात प्लास्टिक व इतर कचरा जास्त येतो. यावर उपाय म्हणजे कचरा वेगवेगळा केला पाहिजे. नाही तर नद्या गटार बनतील. 

‘कचरा हमारी जिम्मेदारी’ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘कचरा हमारी जिम्मेदारी’ ही कचरा हाताळणी कार्यशाळा झाली. मुख्य अभियंता प्रशांत तायशेटे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कार्यशाळेत तीन झोनमधील जवळपास ६० कर्मचारी यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रनगर, भारतनगर, वाल्मिकीनगर, ज्ञानेश्वरनगर भागात मिठी नदीतील कचऱ्याच्या समस्येबाबत नदी संवाद यात्रेचे महत्त्व विशद करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगार, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांना जागरूक करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

महापालिकेने एकत्रित बैठका घेतल्या पाहिजेत. महापालिका आयुक्तांकडून त्यांच्या खालोखाल असलेल्या अधिकाऱ्यांना जेव्हा तलाव आणि नदी संवर्धनाबाबत निर्देश दिले जातात; तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा असते. सल्लागार नेमला म्हणजे संवर्धनाची कामे होतील, असे नाही. पवई आयआयटीमधल्या विद्यार्थ्यांची यासाठी मदत घेतली पाहिजे. तलाव संवर्धनासाठी आम्ही सुचविलेले उपाय अंमलात आणले पाहिजेत. मात्र, या पध्दतीने काम होत नाही. जलसंवर्धनाच्या कामात समन्वय म्हणजे ताळमेळ नाही. तज्ज्ञांचे मत विचारात घेतले पाहिजे. परंतु, या पध्दतीने कामे होत नाहीत.- डॉ. स्नेहल दोंदे, जलनायक

टॅग्स :मुंबई