Join us  

आरपीएफ कॉन्स्टेबलने धार्मिक तेढ पसरवली; चौघांचा जीव घेणाऱ्या चेतनसिंहवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 8:23 AM

सध्या अकोल्याच्या तुरुंगात असलेल्या चेतनसिंहला बुधवारी आरोप निश्चितीसाठी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपनिश्चितीमुळे खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : गेल्यावर्षी पालघर येथे चालत्या ट्रेनमध्ये चारजणांना गोळ्या घालून ठार करणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी याच्यावर बुधवारी सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले. धर्माच्या नावावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला आहे.

सध्या अकोल्याच्या तुरुंगात असलेल्या चेतनसिंहला बुधवारी आरोप निश्चितीसाठी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपनिश्चितीमुळे खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. धावत्या जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये चेतनसिंहने  त्याचे वरिष्ठ सहकारी आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक टिकराम मीणा आणि ट्रेनमधील अन्य तीन प्रवाशांवर सर्व्हिस पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. 

काय घडले होते?गेल्यावर्षी ३१ जुलैला पालघर रेल्वेस्थानकाजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह तीन प्रवाशांना गोळ्या घालून ठार केले होते. गोळीबारानंतर एका प्रवाशाने साखळी खेचून ट्रेन थांबवली असता चेतनसिंह पळ काढत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने जेरबंद केले होते.

- चेतनसिंहचा गुन्ह्यामागील हेतू सरकारी वकील न्यायालयाला सांगत असतानाच त्याचे वकील म्हणाले, की घटनेच्या वेळी त्याची प्रकृती ठीक नव्हती आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता होती. त्याला विश्रांती दिली असती तर ही घटना घडली नसती.   

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसरेल्वे