Join us  

पोलिसांचा पगार आता आॅनटाईम

By admin | Published: May 04, 2016 12:12 AM

बारा-पंधरा तास बंदोबस्त, सतत कामाचा ताण यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच वेळेवर वेतन होत नसल्याने नवी मुंबई पोलिसांमध्ये नाराजी होती.

कळंबोली : बारा-पंधरा तास बंदोबस्त, सतत कामाचा ताण यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच वेळेवर वेतन होत नसल्याने नवी मुंबई पोलिसांमध्ये नाराजी होती.पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या शेवटच्या दिवशी जमा करणे बंधनकारक असताना कधी कधी दहा तारीख उलटली तर वेतन होत नसल्याने घराचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी व इतर अनेक गोष्टींकरिता जुळवाजुळव करताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतल्याने आता नवी मुंबई पोलिसांचे वेगात आॅनटाईम होणार आहेत. ३० एप्रिल रोजी सर्व पोलिसांच्या खात्यात वेतन जमा झाल्याने कर्मचारी खूश असून यात सातत्य राहावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीत नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल व उरण हा भाग येतो. दोन परिमंडळाचा यामध्ये समावेश असून सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त मनुष्यबळ आहे. आयुक्तलयाच्या अखत्यारीत एपीएमसी, महापालिका क्षेत्र, एमआयडीसी, स्टील मार्केट, जेएनपीटी, सागरी पट्टा, पनवेल-सायन, मुंबई- पुणे, मुंबई- गोवा,द्रुतगती महामार्ग येतात. त्याचबरोबर पनवेल, उरण शहर, तालुके आणि सिडको वसाहतींचा समावेश होतो. वाढत्या नागरीकरणाबरोबर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याकरिता पोलिसांना चोवीस तास कार्यरत राहावे लागते. याशिवाय विविध आंदोलने, मोर्चे, सभा, सण, उत्सव या कालावधीत पंधरा ते सोळा तासांपेक्षा जास्त काळ ड्युटी करावी लागते. कोणताही सण, उत्सव असो त्या काळात कोणतीही विपरीत घटना होऊ नये म्हणून कडक पहारा द्यावा लागतो. अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण अतिशय प्रामाणिकपणे करीत असताना त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. जावेद अहमद पोलीस आयुक्त असताना त्यांनी बाबूगिरीला बीमोड घालीत वेळेत पगार सुरू केला. मात्र गेल्या वर्षभरापासून पगाराच्या तारखेत विलंब होत असल्याने पोलिसांचे बजेट कोलमडत आहे. कित्येक जणांचे पाच तारखेच्या आतमध्ये घरांचे हप्ते जातात. मात्र त्यानंतर पगार होत असल्याने हप्ते थकतात अथवा तो भरण्याकरिता उसनवारी घ्यावी लागते. स्मुलांची शाळा, ट्युशन फी, आजारपण, किराणा, वीज, पाणी बिल भरायचे असते. वेळेत वेतन न मिळाल्याने ही सर्व नियोजन कोलमडते. गेल्या महिन्यात मार्च एंडचे कारण दाखवून पगाराकरिता विलंब लावण्यात आला होता. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर ११ एप्रिल रोजी पगार जमा झाला. काम करूनही वेतन वेळेत होत नाही, याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रोष होता. त्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने वेळेत वेतन देण्यास सुरुवात झाली आहे. (वार्ताहर)प्रशासकीय गती वाढलीपगार बिल वेळेत तयार करून ते मंजुरीकरिता संबंधित अधिकाऱ्याच्या सहीने ट्रेझरीत पाठवणे, त्याकरिता पाठपुरावा करणे आदी गोष्टी लिपिकांनी करणे क्र मप्राप्त आहे. अर्थात त्यांच्यावर अधिकाऱ्यांचेही तितकेच नियंत्रण असणे आवश्यक आहे.