Join us  

एकाच नारा : झाडे तोडा; झाडे मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील पायाभूत सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विविध प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील पायाभूत सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. अशा प्रकल्पांमध्ये केवळ रस्ते नाही तर मेट्रो, फ्लायओव्हर, कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. पायाभूत सेवा सुविधा उभारताना झाडे तोडली जातात. सदर प्रकल्प असो किंवा कोणत्याही कामात झाडे तोडावयाची असल्यास, त्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी लागते. महापालिकेने परवानगी दिल्यानंतरच झाडे तोडता येतात आणि त्या मोबदल्यात झाडे लावावी लागतात. मात्र, लावलेली झाडे जगत नाहीत. कारण त्याची देखभाल केली जात नाही. मुंबईत नव्याने रस्ते बांधले जात नसले, तरी रस्त्यांच्या दुरुस्तीसह प्रकल्प आणि इतर कामांसाठी २०१८ साली १२ हजार आणि २०१९ साली १४ हजार झाडांवर संकट ओढावले आहे.

गेल्या ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. आता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ आहे. शहरातील एकूण ८८ प्रभागांपैकी ६८ प्रभागांतील हिरवळ गेल्या २० वर्षांत कमी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका गोरेगावला बसला आहे. २००१ मध्ये ६२.५ टक्के भागांत हिरवाई असलेल्या गोरेगावमध्ये २०११ मध्ये केवळ १७ टक्के हिरवळ उरली. अंधेरी पश्चिम व मालाड भागांतील हिरवळ कमी झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, सायन, परळ, दादर, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला व पवई या परिसरात हिरवाईची कमतरता आहे. पायाभूत सेवा उभारताना झाडे तोडली जातात. ही झाडे तोडल्यानंतर मोबदल्यात झाडे लावली जातात. महापालिकाही गेल्या काही वर्षांपासून झाडांच्या पुनर्रोपणाला भर देत आहे. मात्र, ही झाडे जगण्याचे प्रमाण कमी आहे.

---------------

मोहिमेत सातत्य नाही

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी शिवडी येथील ९४६ झाडे तोडली जाणार आहेत. सँडहर्स्ट रोड येथील हँकॉक आणि महालक्ष्मी येथील दोन उड्डाणपुलांसाठी २८८ झाडे तोडली जाणार आहेत. मेट्रो-४च्या कामांतर्गत १८ झाडांचा बळी जात आहे. प्रकल्पांतर्गत एकूण २८ झाडे बाधित होत आहेत. ६ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. ४ झाडे आहे तशीच ठेवली जाणार आहेत. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पातील धारावी व बीकेसी स्थानकाच्या बांधकामासाठी एकूण १०८ कांदळवन बाधित झाले होते. त्या बदल्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे एकूण ८ हजार ८८८ कांदळवन रोपट्यांचे रोपण करण्यात येणार आहे. झाडे लावण्यासाठी मोहीमही हाती घेतली जाते. मात्र, त्यात सातत्य राहत नाही.

--------------------------

कोणाकडे किती रस्ते?

मुंबईतील २५.३३ किलोमीटर लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, २५.५५ किलोमीटर लांबीचा पूर्व द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील रस्‍ते हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्‍या अखत्‍यारित येतात. बृहन्‍मुंबई महापालिकेचया अखत्‍यारित २ हजार ५५ किलो मीटर लांबीचे रस्‍ते आहेत.

--------------------------

झाडांची स्थिती

मुंबईत नव्याने रस्ते बांधले जात नसले, तरी रस्त्यांच्या दुरुस्तीसह प्रकल्प आणि इतर कामांसाठी २०१८ साली १२ हजार आणि २०१९ साली १४ हजार झाडांवर संकट ओढावले आहे.

--------------------------

किती आहे हिरवळ

- गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईभोवतलच्या हरित कवचामध्ये ४२.५ टक्क्यांची घट झाली.

- १९८८ मध्ये मुंबईच्या एकूण ६३,०३५ हेक्टर या क्षेत्रफळामध्ये २९,२६० हेक्टरचे हरित कवच होते.

- २०१८ मध्ये १६,८१४ हेक्टर इतकेच राहिले आहे.

- ३० वर्षांमध्ये १२,४४६ हेक्टर परिसरावरील हरित कवच नष्ट झाले आहे.

--------------------------

एक झाड तोडल्यानंतर त्या मोबदल्यात दोन झाडे लावली पाहिजेत. मात्र, एक झाडही लावले जात नाही. याबाबत काहीच कार्यवाही केली जात नाही.

- झोरु भथेना, पर्यावरण अभ्यासक

---------------