Join us  

Sanjay Raut: फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले, त्यांची भेट घेणार; संजय राऊत यांचं महत्वाचं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:23 AM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर आज ते १०३ दिवसांनंतर प्रसार माध्यमांसमोर आले.

मुंबई-

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर आज ते १०३ दिवसांनंतर प्रसार माध्यमांसमोर आले. यावेळी संजय राऊत यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झालं तेव्हा मी तुरुंगात होतो. पण देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातलं सरकार तेच चालवत आहेत आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले...

"राज्यातील राजकीय कटुता संपवली पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली त्याचं मी स्वागत करतो. राज्यात नवं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी काही निर्णय नक्कीच चांगले घेतले आहेत. विरोधाला विरोध आम्ही करणार नाही. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवात आहेत. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत. म्हाडाचे अधिकार आम्ही काढले होते ते फडणवीसांनी पुन्हा बहाल केले असे काही निर्णय कौतुकास्पद आहेत. त्यामुळे कामानिमित्त पुढच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.    

तुरुंगात एकाकीपणा खायला उठतो"तुरुंगात राहणं काही सोपं नसतं. जेलमध्ये लोक मजेत राहत असं वाटत असेल तर तसं नाहीय. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हे दिवस खूप खडतर गेले आहेत. तीन महिन्यांनी हाताला घड्याळ बांधलंय आणि तेही सैल होतंय. मला वाटलं तीन महिन्यांनी लोक मला विसरतील, पण लोकांचं प्रेम काल आपण पाहिलं. गेल्या तीन महिन्यांत माझ्या कुटुंबानं खूप काही गमावलं आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानं मोठा संदेश देशात गेला आहे. आपला देश १५० वर्ष गुलामीत होता तेव्हा देखील अस राजकीय वैमनस्य नव्हतं. तुरुंगात तुम्हाला भितींशी संवाद साधायला लागतो. एकाकीपणा खायला उठतो. ज्यांनी माझ्या अटकेचं षडयंत्र रचलं होतं त्यांना आनंद मिळाला असेल तर मीही त्यात सहभागी आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

राज ठाकरेंना लगावला टोलासंजय राऊत यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाचीही आठवण करुन देत त्यांना प्रत्युत्तर दिलं. "राज ठाकरेंनी मला तुरुंगात जावं लागेल असं म्हटलं होतं आणि एकांतात स्वत:शीच बोलायची प्रॅक्टीस करा असाही सल्ला दिला होता. आज मी सांगतो होय मी एकांतात संवाद साधला. कारण सावरकरही एकांतात होते. लोकमान्य टिळकही एकांतात होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. माझीही अटक राजकीय होती हे आता कोर्टाच्या निर्णयानंतर स्पष्ट झालं आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संजय राऊतशिवसेना