...तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार; राज्य सरकारने हाती घेतली मोठी मोहीम, नेमका काय आहे निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 06:05 IST2025-04-06T06:04:34+5:302025-04-06T06:05:05+5:30
अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच कार्डाची तपासणी आता केली जाईल. जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील, ती लगेच रद्द केली जाणार आहेत.

...तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार; राज्य सरकारने हाती घेतली मोठी मोहीम, नेमका काय आहे निर्णय?
मुंबई : राज्यभरात अपात्र रेशन कार्ड शोधमोहीम १ एप्रिलपासून सुरू झाली असून, ती एक महिना राबवली जाणार आहे. बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी याबाबतचा एक आदेश काढला. अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच कार्डाची तपासणी आता केली जाईल. जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील, ती लगेच रद्द केली जाणार आहेत. दरवर्षी अशी मोहीम राबविली जाणार आहे.
रेशन दुकानदारांना त्यांच्याकडील कार्डाची तपासणी करण्यासाठी फॉर्म दिले जाणार आहेत. ते फॉर्म भरून घेतल्यानंतर कोण अपात्र आहेत, ते स्पष्ट होईल. वास्तव्याचा पुरावा सोबत द्यावा लागेल. हा पुरावा एक वर्षापेक्षा जुना नसावा ही मुख्य अट असेल. कार्डधारकांकडून आलेल्या माहितीची तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाईल. ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल, त्यांना १५ दिवसांची मुदत दिली जाईल. पुरावा सादर न केल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड असतील, एका कुटुंबात दोन कार्डे दिलेली असतील, तर त्यातील एक रद्द केले जाईल.
शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचारी यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, अशांकडे पिवळी/केशरी रेशन कार्ड असेल, तर ती तत्काळ अपात्र ठरविली जाईल आणि त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार रेशनकार्ड दिले जाईल. दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मृत व्यक्तींना लाभार्थीच्या यादीतून वगळले जाणार आहे.