मुंबई : राज्यभरात सौरऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प २ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे झाले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माणच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, आदी अधिकारी उपस्थित होते.
टप्प्याटप्प्याने सर्व फिडर सौरऊर्जेवर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकयांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल.
राज्यातील शेतकऱ्यांना १६ हजार मेगावॅट इतकी वीज देतो. हे सर्व फिडर सौरऊर्जेवर आणण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौरऊर्जेवर आणण्यात येतील. शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल.