Join us  

मुंबईच्या चौपाट्यांवर सुरक्षारक्षकांची नजर, बुडण्याच्या दुर्घटना रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 2:42 PM

जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याच्या घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: समुद्रकिनारी व चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जातात. त्यांनी पोहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने समुद्रात शिरू नये, यासाठी पालिकेच्या वतीने सातत्याने जनजागृती केली जाते. तरीदेखील काही नागरिक समुद्रात जातात व प्रसंगी बुडण्याच्या काही घटना घडतात. अशा घटना घडू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील सहा चौपाट्यांवर १२० प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश महापालिकेकडून देण्यात आले आहेत. गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटीच्या ठिकाणी सकाळी आठ ते चारदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षारक्षक, दुपारी तीन ते रात्री अकरादरम्यान ६० सुरक्षारक्षक कार्यरत असतील.

मुंबईचा १४५ किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा कुलाबा येथे सुरू होऊन गोराई आणि तेथून पुढे मुंबई महानगर प्रदेशात पसरलेला आहे. तसेच नागरिक व पर्यटकांना समुद्रकिनारी पर्यटन किंवा फिरण्यासाठी मुंबईत सहा चौपाट्या आहेत. यापैकी गिरगाव आणि दादर चौपाटी शहर विभागामध्ये तर जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी पश्चिम उपनगरात आहेत. या भागात महापालिकेकडून विविध उपाययोजना करूनही बरेचदा नागरिक किंवा पर्यटक नियमभंग करत असल्याचे दिसून आले आहे.

जीवरक्षकांच्या सूचनांकडे करतात दुर्लक्ष

सांताक्रुझ येथील नुकत्याच घडलेल्या घटनेत जीवरक्षकांनी मज्जाव केला तरीही त्यांचे लक्ष चुकवून या तरुणांनी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये, यासाठी सहाही चौपाट्यांवर पूर बचावाचे प्रशिक्षण घेतलेले शहर आपत्ती प्रतिसाद पथकातील सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत.

टॅग्स :मुंबई