Join us  

“विधानसभेच्या २८८ पैकी २२५ जागा आपल्या निवडून येतील”; शरद पवारांचे भाकित, रणशिंग फुंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 4:29 PM

Sharad Pawar News: त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्याची गरज आहे. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करुया, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar News: महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे. कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारे राज्य आणुया. सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूया.  उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करूया, असे आवाहन करत, विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यापैकी २२५ जागा आपल्या निवडून येतील, असा मोठे भाकित शरद पवार यांनी केले. या दाव्यासह आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग शरद पवार यांनी फुंकल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलताना दिसत असल्याची चर्चा आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळतील, याबाबत मोठे विधान केले.

त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्याची गरज 

निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत. चित्र बदलायचे असेल तर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात, ही चांगली गोष्ट आहे. जबरदस्त शक्ती आपण उभी करायला सुरुवात केली आहे. उदगीर आणि देवळालीतील कार्यकर्ते येत आहेत. गेल्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिला. मात्र, या दोन्ही मतदारसंघातील उमेदवाराने मतदारांचा घात केला.  मतदारांनी मते दिली, विधानसभेत पाठवले, त्यांची साथ सोडली आणि वेगळी भूमिका घेतली. पण, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत, असे सूतोवाच करत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्ची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, सुधाकरराव भालेराव आणि इतर नेते आले. देवळालीतील कार्यकर्ते आले आहेत. हे घर तुमच्या सर्वांचे आहे. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने लोकसभेत मतदारांनी निकाल दिला. लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला. त्यामध्ये, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ लोकांना निवडून दिले, ही सुरुवात आहे. आता,  विधानसभेच्या २८८ जागा आहेत, त्यात २२५ पेक्षा जास्त जागा आपल्या निवडून येतील, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडी