Join us  

Shiv Jayanti 2022: शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंनी छ.शिवाजी महाराज पार्कवर महाराष्ट्र सैनिकांना दिली शपथ, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 1:49 PM

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबईतून अनेक महाराष्ट्र सैनिक जमले होते. त्यासाठी शहरातून बाईक रॅली काढून मनसे कार्यकर्ते पार्कात पोहचले.

मुंबई – संपूर्ण राज्यभरात आज शिवजन्मोत्सव सोहळा आनंदाने पार पडत आहे. तिथीनुसार राज्यात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यात मनसेने पुढाकार घेत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवजयंतीचा सोहळा आयोजित केला होता. यावेळी ढोलताशाच्या गजरात, शिवगर्जनेत मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहे. तत्पूर्वी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर जात शिवाई मातेची पूजा केली.

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबईतून अनेक महाराष्ट्र सैनिक जमले होते. त्यासाठी शहरातून बाईक रॅली काढून मनसे कार्यकर्ते पार्कात पोहचले. याठिकाणी मनसेकडून पार्कातील अश्वारूढ छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या शिवजयंती सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) उपस्थित होते. त्यावेळी राज ठाकरेंनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्यासाठी एक शपथ दिली.

राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना दिली शपथ, म्हणाले...

शिवजयंतीनिमित्त शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा करू. हे सुराज्य स्थापन करताना जातीजातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल. राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल. त्यांचा आत्मसन्मान राहील. युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल. इथला प्रत्येक मूल शाळेत जावून शिकत असेल. लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल.

इथली शहरं, गावं, पाडे, तांडे सुंदर, सुकर आणि सुरक्षित असतील. भ्रष्टाचार नष्ट होईल. आमच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल. कामगारांना न्याय मिळेल. यासाठी जे पडेल ते करू. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी, स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचे स्मरण ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू. आम्ही महाराजांचे मावळे आहोत. सैनिक आहोत. याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो.  

टॅग्स :शिवजयंतीमनसेराज ठाकरे