Maharashtra Political Crisis: ५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:56 IST2022-08-23T13:55:51+5:302022-08-23T13:56:29+5:30
Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि भाजपला सत्तेची मस्ती आल्याची संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

Maharashtra Political Crisis: ५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर!
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. याही दिवशी विरोधक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. पुन्हा एकदा शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर खोचक टीका करण्यात आली. मात्र, याचवेळी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) शिंदे गटातील एका नेत्याने ५० खोके हवेत का, अशी मिश्किल विचारणा केली. यावर आदित्य ठाकरे संतप्त झाले आणि शिंदे गट तसेच भाजपला सत्तेची मस्ती आल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केल्याचे सांगितले जात आहे.
मंत्री महोदय यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आपल्याला ५० खोके हवेत का असे बोलले होते. सत्तेच्या मस्तीत अशी उत्तर कोण देऊ शकतो का, असा संतप्त सवाल शिवसेना आदित्य ठाकरे यांनी केला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ५०-५० बिस्कीटांचे पुडे घेऊन घोषणाबाजी केली. आमच्या हातात ५०-५० बिस्कीटांचे पुडे आहेत मात्र त्यांच्या हातात काय आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारमध्ये आता मंत्री असलेले त्यावेळी गुवाहाटीला का गेले, असा सवाल त्यांनी केला.
ही फक्त राजकीय घोषणाबाजी होती का
दहीहंडीबाबत केलेली घोषणा अद्याप जी. आर. निघालेला नाही. ही फक्त राजकीय घोषणाबाजी होती का, असा प्रश्न करत, अजूनही कुणाला मदत मिळालेली नाही. जांबोरी मैदानात उत्सव झाला. त्यामुळे झालेले नुकसान हे पाहायला हवे. आम्ही त्या मैदानाचे नुकतेच सुशोभीकरण केले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच गद्दार सरकारचे, तात्पुरत्या सरकारच्या मंत्र्यांचे वक्तव्य देशाने बारकाईने ऐकायला पाहिजे. पक्षाशी, कुटुंबप्रमुखांशी गद्दारी केली तर त्यांना गद्दारच म्हणणार, असे आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले.