Join us  

संजय राऊत आमची बुलंद तोफ; त्यांच्या एका हाकेवर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील- वरुण सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 1:20 PM

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक हाक दिली, तर शिवसैनिक रस्त्यावर उतरेल असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.

मुंबई- मुंबई- मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीसह त्यांच्या निकटवर्तीयांची ११.१५ कोटींच्या मालमत्ता जप्त केली. जप्त मालमत्तांत राऊत यांच्या पत्नीच्या नावावरील दादरच्या फ्लॅटसह निकटवर्तीयांच्या रायगड व पालघरमधील मालमत्तांचा समावेश आहे. 

प्रवीण राऊत यांच्या नावे असलेल्या पालघर जिल्ह्यातील जमिनीसह राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत तसेच स्वप्ना पाटकर या दोघींच्या नावावरील अलिबागमधील किहिम बीच येथील ८ प्लॉटसह वर्षा राऊत यांच्या नावावरील दादर येथील फ्लॅटवर ईडीने टाच आणली. राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या स्वप्ना पाटकर पत्नी आहेत. किहिम बीच येथील ८ प्लॉटच्या खरेदी व्यवहारात नोंदणी, इतर बाबींचे रोख व्यवहार झाले आहेत.

संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महविकास आघाडी एकत्रित करण्यास संजय राऊत यांचं मोठं योगदान आहे. ते शिवसेनेचे प्रमुख वक्ते असून बुलंद तोफ आहे. त्यांनी एक हाक जरी दिली, तर शिवसैनिक रस्त्यावर उतरेल, असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला आहे. तसेच भाजपचे १०५ आमदार संजय राऊत यांच्यामुळे घरी बसलेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याच्या रागातून संजय राऊतांवर ही कारवाई केली जात असल्याचा आरोपही वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते. 

दरम्यान, माझे राहते घर व स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने भाजपला उकळ्या फुटत असेल, अशा कारवाईला मी घाबरत नाही. १ रूपया जरी अवैध असेल तर ती संपत्ती भाजपला दान करेल. महाराष्ट्रात सेनेसोबत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या मला दिल्या. महाराष्ट्रातही लवकरच कारवाईचे सत्र पाहायला मिळेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 

लोकशाहीचे नव्हे, दबावशाहीचे वातावरण- 

केंद्रीय यंत्रणांची कारवाई राजकीय हेतूने सुरू आहे. राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईत सूडबुद्धी स्पष्ट दिसत आहे. सध्या देशात जे काही सुरू आहे ते लोकशाहीचे नव्हे, तर दबावशाहीचे वातावरण आहे. शिवसेना भाजपसोबत गेली नाही, त्यामुळे या कारवाया सुरू आहेत. - आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री

राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न-

शिवसेना खा. संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते. या कारवायांच्या माध्यमातून राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  - जयंत पाटील, मंत्री 

टॅग्स :संजय राऊतवरुण सरदेसाईशिवसेनामहाराष्ट्र सरकारभाजपा