Join us

"बरं ते जॅकेट कायमचं उतरलंय की हा ‘Lockdown Look’ आहे?"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 8:41 AM

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली होती.

मुंबई: राज्यात अघोषित आणिबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असा आरोप भाजपाने केला होता. तसेच यासंबंधित राज्य सरकारला जाब विचारा अशी विनंती देखील भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली होती. मात्र या भेटीवर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी ट्विटरद्वारे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

वरुण सरदेसाई यांनी बरं ते जॅकेट permanently उतरले आहे की हा ‘Lockdown Look’ आहे असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तत्पूर्वी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात तक्रार करत जाब विचारण्याची विनंती राज्यपालांना केली. राज्यपालांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, वाधवान प्रकरणात एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी सरकारने दिलेलं पत्र सार्वजनिक केल्याने काही दिवसांतच वांद्र्यातील गर्दीचा ठपका ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. मुंबईत हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याने अनेक संवेदनशील क्षेत्रातून प्रवास करुन उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आले. त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर हा संपूर्ण प्रसंग त्यांनी स्वत:च कथन केला आहे असं सांगण्यात आलं.

सोशल मीडियावर सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहे. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थांनी सांगितले असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्धा आता याबाबत राज्य सरकारला जाब विचारला आहे. एकूणच हा प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्त्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणिबाणीसदृश आहेत या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला जाब विचारावा अशी मागणी भाजपा नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपाभगत सिंह कोश्यारीमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरे