Join us  

“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 7:08 PM

Uday Samant News: प्रकल्प आला की, विरोध करायचा आणि तो पूर्ण झाला की, माझ्यामुळे झाला असा आव आणायचा. ठाकरे गटाचे हे धोरण फार काळ टिकणार नाही, अशी टीका उदय सामंत यांनी केली.

Uday Samant News: तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. ती पूर्वपदावर आणण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केले. दोन वर्षात महाराष्ट्र एफडीआयमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. खोट्या नरेटिव्हने उद्योग खात्यावर टीका करताना भान बाळगावे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना खडसावले. 

अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेचा मंत्री उदय सामंत यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. वारकरी दिंड्यांना सरकारने २० हजारांचे अनुदान दिले. मात्र काही जणांना पोटदुखी झाली. या घोषणेला विरोध करताना वारकरी संप्रदायाचा अपमान केला. वारकरी भवन बांधण्याची भीष्म प्रतिज्ञा मविआ सरकारमध्ये काही जणांनी केली होती. त्याचे काय झाले हा प्रश्न वारकऱ्यांनी विचारला पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार रिफायनरीला समर्थन करतात आणि माजी खासदार विरोध करतात. यावर ठाकरे गटाने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशाच प्रकारे वाढवण बंदराला विरोध केला जात आहे. प्रकल्प आला की, विरोध करायचा आणि तो पूर्ण झाला की, माझ्यामुळे झाला असा आव आणायचा हे फार काळ टिकणार नाही, अशी टीका उदय सामंत यांनी केली. 

उद्योग विभागावर टीका करताना विरोधकांनी भान ठेवायला हवे

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एमआयडीसीबाबत लक्षवेधी विचारण्यात आली होती. ज्याप्रकारे विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत फेक नरेटिव्ह पसरवण्यात आला होता तसाच हा प्रश्न होता. जिथे एमआयडीसी नाही तिथून गुजरातला प्रकल्प गेले, असा खोटा दावा करण्यात आला. यामुळे तीन वर्षात डावोसला झालेल्या गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रात किती एफडीआय, किती करार झाले आणि किती अंमलबजावणी झाली त्याची सरकारकडून श्वेतपत्रिका काढण्यात येईल. उद्योग खात्यावर खोट्या नरेटिव्हने टीका केल्याने गुंतवणूकदार, उद्योजकांमध्ये एक अडथळा निर्माण होतो. त्याचा परिणाम राज्यावर होतो. उद्योग विभागावर टीका करताना विरोधकांनी भान ठेवायला हवे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वर्ष २०२२-२३ मध्ये राज्याचा जीडीपी ९.४ टक्के इतका वाढला. गुजरातचा केवळ ८ टक्के इतका होता. एफडीआयचा आलेख बघितला तर मागील सलग दोन वर्ष महाराष्ट्र एफडीआयमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकाला मागे टाकले आणि अव्वल राज्य बनले. महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न १४.९५ टक्क्यांनी वाढले. महाराष्ट्र देशातील स्टार्टअप्स बनले आहे. राज्यात नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्या एकूण २१,१०५ नोंदणीकृत स्टार्टअप्स असून, त्यातून २,३७,१७१ रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.  

 

टॅग्स :उदय सामंतशिवसेनाविधानसभा