Join us

शिवसेना बाळासाहेब भवनात भरणार आठवड्यातील ५ दिवस जनता दरबार

By मनोहर कुंभेजकर | Published: October 20, 2023 2:40 PM

राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणार आहेत. 

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सोमवार ते शनिवार शिवसेनेचे दोन मंत्री बाळासाहेब भवनात जनता दरबारच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणार आहेत. 

राज्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न व समस्या मग त्या शेतीसंदर्भात असो, गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर असोत किंवा मंत्रालय संबंधित काही काम असो, त्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ९ मंत्र्यांना आठवड्यातील शिवसेना बाळासाहेब भवन येथे जनता दरबार घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी ९ मंत्र्यांची बैठक घेऊन  आदेश दिले आहेत. प्रत्येक दिवशी म्हणजे सोमवारी दादा भुसे व उदय सामंत, मंगळवारी शंभूराजे देसाई व संदीपान भुमरे, बुधवारी दीपक केसरकर व तानाजी सावंत, गुरुवारी अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील आणि शुक्रवारी संजय राठोड शिवसेना बाळासाहेब भवनात जनता दरबार घेण्यात येणार आहे. 

याबद्दल अधिक माहिती देताना मंत्री अब्दुल सत्तर म्हणाले की, शिवसेना बाळासाहेब भवनामध्ये आपले प्रश्न आपल्या समस्या घेऊन येणारे लोक मग ते कामगार, शेतमजूर, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, कोणत्याही जातीधर्माचे असू देत त्यांच्या समस्यांचे निराकरण जनता दरबाराच्या माध्यमातून करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आम्हा ९ मंत्र्यांना दिलेले आहेत. ८०% समाजकारण व २०% राजकारण अशी जी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांची पद्धत होती. त्याच पद्धतीने काम करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाची सुरुवात केलेली आहे.

राज्यातील जनतेचा व राज्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक लोक विधायक निर्णय घेतले. त्यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मग तो गरीब असो व श्रीमंत प्रत्येक व्यक्तीला ५ लाख रुपये वैद्यकीय विम्याचे कवच देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. जे अडीच वर्षे सत्तेत होते त्यांनी जनतेसाठी अडीच कोटी निधी जाहीर केला नाही, पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात १२५ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :शिवसेना