Join us  

बिहारात शिवसेनेची अशीही ‘बाणे’दार युती!

By admin | Published: September 25, 2015 3:07 AM

बिहार विधानसभा निवडणुकीत १५० जागांवर उमेदवार देऊन स्वबळाच्या बेटकुळ््या फुगवणारी शिवसेना भाजपाच्या इशाऱ्यावरूनच मैदानात उतरल्याचे सांगण्यात येत आहे

संदीप प्रधान, मुंबईबिहार विधानसभा निवडणुकीत १५० जागांवर उमेदवार देऊन स्वबळाच्या बेटकुळ््या फुगवणारी शिवसेना भाजपाच्या इशाऱ्यावरूनच मैदानात उतरल्याचे सांगण्यात येत आहे. नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड)चे चिन्ह हे बाण असून शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आहे. या साधर्म्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण झाला तर शिवसेनेचा बाण नितीशकुमार यांच्या वर्मी लागेल आणि भाजपाला बिहारचा गड सर करणे सोपे होईल, असे यामागचे राजकारण आहे.केंद्रात व राज्यातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असतानाही आम्हाला विश्वासात घेतले नाही, अशी आदळआपट करीत शिवसेनेने बिहारमध्ये १५० जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाला व ते बिहारमध्ये प्रचाराकरिता जाणार असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. प्रत्यक्षात स्वतंत्र चिन्हावर लढणे ही भाजपाचीच रणनिती असल्याचे बोलले जाते. जद(यू)चे उमेदवार बिहारमध्ये ‘तीर पे मोहर लगाओ’ असा प्रचार करीत असताना गैरसमजुतीतून शिवसेनेच्या ‘तीर-कमान’ला मते पडली तर त्याचा थेट लाभ भाजपाला होतो, अशी ही भाजपाची रणनिती असल्याचे कळते.यापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (आप)च्या विरोधात (बाप) असा फुटकळ पक्ष उभा राहिला होता. त्या पक्षाच्या टॉर्च चिन्हावर काही उमेदवार लढले होते. आपचा ‘झाडू’ न बापचा ‘टॉर्च’ या चिन्हातील साधर्म्यमुळे ‘आपह्णला पहिल्या निवडणुकीत बहुमत मिळाले नव्हते. त्याच धर्तीवरील राजकीय खेळीकरिता यावेळी भाजपाने शिवसेनेला आपल्या दावणीला बांधल्याचे सांगण्यात येते.