Join us

२०२४ मध्ये मोदी-शाह अन् भाजपाच्या नाझी फौजांचे पतन होईल; शिवसेनेचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 7:48 AM

नवाब मलिक हे निर्भय आणि बेडर आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडला आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे.

मुंबई - महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये ही श्रींची इच्छा होती. २०२४ साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते. महाराष्ट्रात आता एका विकृत बेहोशीत हवेत तलवारी चालवणारेही स्वतःच्याच तलवारीने घायाळ होतील. महाराष्ट्राचे ‘ठाकरे’ सरकार अशा हवेतील तलवारबाजीने पडणार नाही. एका कॅबिनेट मंत्र्यास गुंतविण्यासाठी जे कपट घडवले, तो लोकशाहीचा खून आहे अशा शब्दात शिवसेनेने(Shivsena) नवाब मलिकांच्या अटकेवर भाष्य केले आहे.

शिवसेनेने म्हटलंय की, नवाब मलिक(Nawab Malik) हे ईडीच्या कार्यालयातून हसत हसत बेडरपणे बाहेर आले व मूठ आवळून त्यांनी नारा दिला, खोटेपणापुढे झुकणार नाही, लढत राहीन व जिंकेन! हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे. नाझी भस्मासुराचा जसा उदय झाला तसा अंतदेखील झाला हे सध्याच्या मस्तवाल राज्यकर्त्यांना लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे सध्या काम करीत आहेत व आपल्या राजकीय मालकांचे बेकायदेशीर हुकूम मानीत आहेत. सत्य बोलणाऱ्यांचा गळा घोटणे ही मर्दानगी नव्हे असा टोला भाजपाला(BJP) लगावण्यात आला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी गुरुवारी सकाळी ‘ईडी’ नामक ‘नाझी फौजा’ पोहोचल्या व २००३ सालच्या एका प्रकरणात त्यांना अटक केली. २००३ साली नवाब मलिक यांनी एक जमीन खरेदीचा व्यवहार केला. तो संबंध दाऊद इब्राहिमशी जोडून मलिक यांच्यावर मनी लॉण्डरिंगपासून गैरव्यवहार, टेरर फंडिंग असे अनेक गुन्हे दाखल केले आहेत.

२००३ च्या व्यवहारात २०१३ साली आलेला मनी लॉण्डरिंगचा कायदा लागू होत नाही. तरीही भाजपच्या नाझी फौजांनी नवाब मलिक यांना अटक केली व त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. मुंबईतील भाजपच्या काही लोकांनी रस्त्यावर येऊन तलवारी उपसल्या व धमक्यांची भाषणे केली.

हा जल्लोष बहुधा यासाठी असावा की, मोदी-शहा यांच्या मनमानीविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या खोटेपणाचा रोज बुरखा फाडणाऱ्या नवाब मलिक यांचा आवाज नाझी फौजांनी दाबला आहे. भाजपविरुद्ध सत्य बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआयच्या नाझी फौजा चिरडून टाकतील, असाच संदेश देण्यात आला आहे.

नवाब मलिक हे निर्भय आणि बेडर आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडला आहे. समीर वानखेडे व त्यांची एनसीबी मधल्या काळात भारतीय जनता पक्षाची बटीक बनली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यास क्रुझ पार्टीतील अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करताच त्या बनावट प्रकरणाचा पुरता पर्दाफाश करणारे नवाब मलिक होते व शेवटी वानखेडे नामक अधिकाऱ्यास जावे लागले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा समोर आला.

नवाब मलिक यांच्या जावयासही खोटय़ा प्रकरणात अडकवून दबाव आणला गेला होता. तरीही मलिक झुकले नाहीत व त्यांनी भाजप विरोधाची लढाई सुरूच ठेवली. या लढाईत आता भाजपने नेहमीप्रमाणे पाठीमागून वार केला व विजय झाल्याचा आव आणला.

भाजपच्या लोकांनी मुंबईत तलवारी उपसल्या, पण त्यांनी इतिहासाचे भान ठेवले तर लक्षात येईल की, तलवार चालवणारे शेवटी तलवारीच्या घावानेच मरतात. फडणवीस यांनी तर मलिक यांना जेलमध्ये पाठविण्याचा पणच केला होता. फडणवीस म्हणतात, मलिक यांनी देशाच्या दुश्मनांशी व्यवहार केलाच कसा? हा प्रश्न चुकीचा नाही.

दाऊद हा देशाचा दुश्मन आहेच, पण तसे नवाज शरीफही आहेत, इम्रान खानही आहेत. त्यांनीच दाऊदला लपवून ठेवले आहे, पण त्याच नवाज शरीफला भेटण्यासाठी व मिठी मारण्यासाठी पंतप्रधान मोदी हे खास पाकिस्तानला जाऊन आले.

नवाज शरीफ यांच्याच काळात कारगील झाले होते. कश्मीरात आजही हत्यासत्र सुरू आहे व चीनचे घुसखोर मोदी सरकारला बाहेर काढता येत नाहीत. हीसुद्धा दुश्मनांशी हातमिळवणीच आहे. गुजरातमध्ये ऋषी अगरवाल नामक माणसाने राष्ट्रीय बँकांना 23 हजार कोटींना लुबाडले हीसुद्धा देशाशी दुश्मनी आहे.

त्या अगरवालला वाचविणारे दाऊदपेक्षा मोठे असेच देशाचे दुश्मन आहेत. त्यावर कोणीच का बोलत नाही? नवाब मलिक यांना ज्या प्रकरणात अडकविले आहे, त्याचा फैसला न्यायालयात होईल. देशातला कायदा मेलेला नाही व जनता झोपलेली नाही हे उद्या कळेल.

हिंमत असेल तर पाकिस्तानात घुसून दाऊदला खतम करा, नाहीतर फरफटत हिंदुस्थानात घेऊन या. हे लोक बार्बाडोसमधून मेहुल चोक्सी या भगोडय़ास आणू शकले नाहीत, तेथे दाऊदचे काय? केंद्रीय तपास यंत्रणांना आपले गुलाम करून ते मनमानी करीत आहेत. राजकीय विरोधकांना नामोहरम करीत आहेत.

महाराष्ट्रात शरद पवार व त्यांचे कुटुंब, उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंब, संजय राऊत व त्यांचे कुटुंब, अनिल परब, अनिल देशमुख वगैरेंवर बदनामी व खटल्याची कैची लावून विकृत आनंद साजरा करणे हे कसले राजकारण? नवाब मलिकांचे प्रकरण मागे पडेल अशी प्रकरणे भाजप नेत्यांच्या खात्यावर जमा आहेत.

आज नाचणारे, तलवारी चालविणारे, खोटे आरोप करणारे भाजपचे पंटर्सही आयुष्यभर तुरुंगात जातील, अशी प्रकरणे उघड होत असताना ‘ईडी’च्या नाझी फौजा त्याकडे दुर्लक्ष करतात. नवाब मलिक यांना आत टाकले, ते केव्हातरी सुटतील. ते सुटतील तेव्हा ते भाजप व त्यांच्या नाझी फौजांसाठी अधिक धोकादायक ठरतील.

महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये ही श्रींची इच्छा होती. 2024 साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते. त्या वेळी नाझी फौजांच्या सरदारांवर खटले चालवून तुरुंगात टाकले जाईल.

टॅग्स :नवाब मलिकशिवसेनाभाजपा