Join us  

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी ‘शिवशाही’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे १९ जुलै रोजी प्रस्थान करणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बस सज्ज आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

अनिल परब म्हणाले की, आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत. १९ जुलै रोजी या बसेस पालख्यांसोबत पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस सज्ज झाल्या आहेत. या बसेस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहेत. पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास शिवशाही बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जातील. वारकरी संप्रदायांचा हा प्रवास सुखकर होण्यासाठी शिवशाहीचे चालक योग्य ती खबरदारी घेतील, असेही ते म्हणाले.