Join us  

Shraddha Walker Murder Case: 'श्रद्धाने लिहिलेलं पत्र गंभीर आहे, मीही ते वाचलं'; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 2:35 PM

Shraddha Walker Murder Case: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्रद्धाने लिहिलेलं पत्र गंभीर असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली/मुंबई- लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने  मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली. त्याने हा गुन्हा रागाच्या भरात केल्याची कबुली दिल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. 

आफताबचा जबाब अन् संपूर्ण यंत्रणा कामाला लागली; अख्खा तलाव रिकामा केला, पण...

श्रद्धा आणि आफताब यांचे सुरुवातीपासूनच भांडणं सुरु होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर श्रद्धा आज या जगात असती, अशीही चर्चा रंगली आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्रद्धाने लिहिलेलं पत्र गंभीर असल्याचं म्हटलं आहे. मी श्रद्धाने लिहिलेलं पत्र वाचलं. पत्र लिहूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही, याची चौकशी करणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही. मात्र वेळीच कारवाई झाली असती तर तीचा जीव वाचला असता, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 

दरम्यान, आफताबपासून जीवाला धोका असल्याची तक्रार २०२० मध्येच श्रद्धाने याबाबत नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्थानकात दाखल केली होती. आफताब सतत गळा दाबून मारण्याची धमकी देत असल्याचं श्रद्धाने तक्रारीत नमूद केलं होतं. तसेच आफताबच्या परिवाराला याबाबत सर्व कल्पना असल्याचंही श्रद्धाने तक्रारीत म्हटलं होतं. या तक्रारीनंतरही पोलिसांनी कारवाई न केल्यानं आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :श्रद्धा वालकरदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकारपोलिस