Join us  

निसर्गरम्य दाभोसा कोसळू लागला

By admin | Published: June 28, 2017 3:07 AM

गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला दाभोसा धबधबा भरभरून कोसळू लागला आहे.

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार वृष्टीमुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला दाभोसा धबधबा भरभरून कोसळू लागला आहे. त्यामुळे तरुणाईचे व अन्य पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे या परिसरात उसळत आहेत. जव्हार आज प्रामुख्याने ओळखले जाते ते येथील दाभोसा या निसर्गरम्य आणि विलोभनिय धबधब्यामुळे. जव्हार तलासरी, सिल्व्हासा या मार्गावरील दाभोसा जव्हारहून साधारणत: २० कि.मी. अंतरावर आहे. तेथील लेंढी नदीवर दाभोसा - दादरकोपरा धबधबा आहे. धबधब्याचे डोह सुमारे ७० ते ८० फुट खोल आहे. धबधब्याचे पाणी ३०० फुट खोल एका डोहात पडत असते पावसाळ्याच्या हंगामात या ठिकाणी लांब लांबहुन पर्यटक येत असतात. बऱ्या पैकी जंगल राहिले असल्याने पावसाळ्यातील हिरवीकंच वनश्री मन मोहरून टाकते. पावसाळ्यातले सौदर्य वेगळेच. पण भर उन्हाळ्यात देखील दाभोसा तितकाच आकर्षित करीत असतो. पाण्याची धार कमी कमी होत जात, पण पर्यटकांची गर्दी तितकीच असते. काही अति उत्साही पर्यटकांमुळे हा धबधबा धोक्याचे ठिकाण ठरू लागला आहे. येथील डोहात बुडण्याच्या दुर्दैवी घटना बऱ्याच घडल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून सां.बा. विभाग व फॉरेस्ट विभाग खाली उतरण्यासाठी चांगली सोय करू शकलेला नाही. काही प्रमाणात तेथे थातूरमातूर पध्दतीने पायऱ्या बनविण्यात आल्या होत्या मात्र जास्त पावसामुळे मातीसोबत पायऱ्याही वाहून जात असल्यामुळे दरवर्षी खाली उतरण्याकरीता कसरत करून तोल सांभाळून दरीत खाली उतरावे लागते. जमीनीपासून डोहाचे अंतर ५०० ते ६०० मिटर असून पाण्याजवळ गेल्यानंतर खोलीचा अंदाज येत नाही. तसेच आजूबाजूला संरक्षक भिंतीही नाहीत, साधे धोका दर्शक फलकही नाहीत. मद्य प्राशन करणारे तर तेथे हमखास असतात. पण तारूण्याच्या धुंदीत वास्तवाचे भान नसणारे अति उत्साही पर्यटक अलगतपणे पाण्याच्या भोवऱ्यात किंवा कपारीत केव्हा अडकतात ते कळत नाही. त्यामुळे प्रसिध्द असलेला जव्हारचा हा धबधबा दुर्दैवी घटनांसाठी कुख्यात होऊ नये म्हणून संबंधीत खात्यानी या ठिकाणी सुरक्षिततेचे उपाय योजणे अत्यंत गरजेचे आहे. जव्हार-सेलवास रोडवरून दाभोसा फाटा ते दाभोसा गांव हे २ कि. मी. अंतर असून अगदी अरूद रस्ता असल्यामुळे चारचाकी दोन वाहने एकावेळी पास होणे कठीण होते, प्रत्येक वेळेस वाहन चालकांना कमालीची कसरत करून वाहन मागे पुढे करून मार्गाक्रमण करावे लागते, त्यामुळे या ठिकाणी रस्ता रूंदीकरण करणे गरजेचे आहे. पूर्वी या ठिकाणी जाण्या येण्या करीता रस्ता नव्हता. मात्र आता दाभोसा या गावापासून तर धबधब्या पर्यतचा रस्ता डांबरीकरण केल्यामुळे पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत. गेल्या काही वर्षात काहीप्रमाणात शासनाकडून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.