Join us

आता त्सुनामीपूर्वी वाजणार सायरन

By admin | Published: October 26, 2015 1:32 AM

इंडोनेशिया आणि त्यानंतर जपानमध्ये आलेल्या त्सुनामीनंतर किनाऱ्यालगतच्या परिसरातून जीवितहानी टाळण्याच्या उद्देशाने ‘त्सुनामीपूर्वीच सायरन वाजणारी यंत्रणा’ मुंबईतील नौदलाच्या आयएनएस

मुंबई : इंडोनेशिया आणि त्यानंतर जपानमध्ये आलेल्या त्सुनामीनंतर किनाऱ्यालगतच्या परिसरातून जीवितहानी टाळण्याच्या उद्देशाने ‘त्सुनामीपूर्वीच सायरन वाजणारी यंत्रणा’ मुंबईतील नौदलाच्या आयएनएस आंग्रे तळावर बसवण्यात आली आहे. सोमवारी २६ आॅक्टोबर रोजी या यंत्रणेची चाचणी केली जाणार असल्याची माहिती पश्चिम नौदल विभागाकडून देण्यात आली. या सायरनमुळे दक्षिण मुंबईला याचा फायदा होईल, असे नौदलाकडून सांगण्यात आले.भूकंप, ज्वालामुखी याचा तडाखा समुद्रालाही बसल्यास मोठी त्सुनामी येण्याची शक्यता असते. यामुळे उंचच उंच उडणाऱ्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यालगत धडकल्यास त्याचा फटका परिसराला बसू शकतो आणि मोठी जीवितहानी होऊ शकते. २00४ साली इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा बेटाजवळील समुद्रात ९.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे मोठ्या लाटा उसळून झालेल्या त्सुनामीमुळे इंडोनेशियासह, भारत, श्रीलंका, थायलंडच्या किनारा परिसरात नुकसान होऊन जीवितहानी झाली होती. २0११ सालीही जपानच्या किनारपट्टीला त्सुनामीचा तडाखा बसला होता. एकूणच त्सुनामीमुळे होणारी वित्तहानी आणि जीवितहानी पाहता ती कशी टाळता येईल याचा विचार केंद्राच्या भूविज्ञान मंत्रालयाकडून केला जात होता. अखेर भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असणारी आयएनसीओआयएसकडून (इंडियन नॅशनल सेंटर ओशेन इर्न्फोमेशन सिस्टिम सर्विस) त्सुनामीपूर्वी इशारा देणारी सायरन वाजणारी यंत्रणा तयार करण्यात आली; आणि ही यंत्रणा मुंबई पश्चिम नौदलाच्या आयएनएस आंग्रे तळावरील हवामान विभागात बसवण्यात आली आहे. या यंत्रणेची चाचणी २६ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ ते १२.१0 या वेळेत घेतली जाणार आहे. ही यंत्रणा हैदराबादमध्ये असणाऱ्या आयएनसीओआयएसशी थेट आणि रिमोटद्वारे जोडलेली असेल. त्सुनामी येण्यापूर्वी आयएनसीओआयएसकडून याची माहिती देऊन आयएनएस आंग्रेवरील सायरन यंत्रणा वाजवण्यात येईल. त्यामुळे किनारा आणि त्या परिसरात असणाऱ्यांना सावध करून जीवित तसेच वित्तहानी टाळता येईल. याबाबत नौदलाचे प्रवक्ता राहुल सिन्हा यांनी सांगितले की, समुद्रात त्सुनामी येत असल्याचे लक्षात येताच मुंबई किनारपट्टीसाठी असणारा हा सायरन वाजेल. जवळपास ३ किलोमीटर परिसरापर्यंत या सायरनचा आवाज जाऊ शकतो, एवढी त्याची क्षमता आहे. काही वर्षांपासून ही यंत्रणा पश्चिम नौदलाच्या आयएनएस आंग्रे तळावरील हवामान विभागात बसवण्याचे काम सुरू होते. ते पूर्ण झाले असून, या चाचणीनंतर ही यंत्रणा नियमित केली जाईल.