Join us

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६३ हजार गुन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 5:40 PM

१४ हजार व्यक्तींना अटक तर ४४ हजार वाहने जप्त

मुंबई - राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २१एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६२,९८७ गुन्हे दाखल झाले आहेत तर १३,८६९ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४४,१३५ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७४,६१६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ५९५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०६७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.  या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २कोटी ४१ लाख(२ कोटी ४१ लाख ) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

   

64 पोलिसांना बाधा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने १२पोलीस अधिकारी व ५२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १३४घटनांची नोंद  झाली असून  यात ४७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या