राज्याबाहेरुन माणसं आणून दंगा करण्याचा काहींचा डाव, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 03:04 PM2022-05-03T15:04:18+5:302022-05-03T15:05:40+5:30
राज्याबाहेरुन माणसं इथं आणून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव आखला जात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई
राज्याबाहेरुन माणसं इथं आणून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव आखला जात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. संजय राऊत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यव्यवस्था राखण्याबाबत तसेच राज ठाकरेंविरोधातील कारवाई संदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
राज ठाकरेंविरोधात औरंगाबादमध्ये आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे. याच बाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता भडकावू भाषण करणं, कायदा व सुव्यवस्था बिघडवणं याविरोधात कायदेशीररित्या कारवाई होत असते. त्यात काही नवीन नाही, असं ते म्हणाले. पोलिसांवर दबाव आणून राज्य सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे. याबाबतही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. "राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे. अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार राज्यात बाहेरुन माणसं आणून दंगा करण्याचा काहींचा डाव आहे. पण राज्याचं गृहखातं सक्षम आहे. सरकारला बदनाम करण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे डाव सरकार उलथवून पाडेल", असं संजय राऊत म्हणाले.