जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकल कधीही वेळेवर नसतात. रात्री आठ वाजता सीएसटीवरून सुटणारी एसी लोकल सव्वाआठ वाजले तरी सुटत नाही; त्यामुळे त्यापुढील गाड्याही रखडतात. गाड्या वेळेवर नसल्याने डोंबिवली-कल्याण या ठिकाणी जाणाऱ्यांना रखडपट्टी सहन करावी लागते. उशिरा गाडी सुटत असल्याने कल्याण-डोंबिवलीला जाणाऱ्या गाड्या सीएसटीलाच गर्दीने भरतात. त्यामुळे दारावर लोंबकळत प्रवास करावा लागतो. रात्री सीएसटीवरून सुटणाऱ्या गाड्या कायम दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतात. रात्री आठनंतर तर अनेकदा फलाटावर गाड्याच नसतात. गाड्या विलंबाने सुटत असल्याने फलाटांवरची गर्दी वाढत जाते.
मेट्रोच्या गर्दीची भर- घाटकोपर फलाट क्रमांक १ वर रात्री गर्दीच्या वेळी उभे राहण्यासाठीही जागा नसते. मेट्रोची मोठी गर्दी या फलाटावर उतरते. या स्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवासी उतरतात. उतरणारे प्रवासी आणि चढणारे प्रवासी यांच्यात अनेकदा हातघाई होते. - प्रवाशांचे लोंढे एकमेकांच्या अंगावर आदळतात; त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे. मेट्रो स्थानकातून उतरणारी गर्दी लक्षात घेता घाटकोपर फलाट क्रमांक एकचा विस्तार होणे गरजेचे आहे. - अनेक वर्षांपासून ही मागणी होत आहे. मात्र या मागणीची दखल घेतल्याचे दिसत नाही. या स्थानकाचा फलाट क्रमांक १ तर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असा आहे. या स्थानकात कोणत्याही बाजूने प्रवेश करता येतो.