यशस्वी उद्योजकांची कोरोना संकटग्रस्तांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:54 AM2020-04-29T01:54:32+5:302020-04-29T01:54:52+5:30

आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले असून कोरोनाच्या संकटात ते आता इतरांना मदत करीत आहेत.

Successful Entrepreneurs Help Corona Crisis | यशस्वी उद्योजकांची कोरोना संकटग्रस्तांना मदत

यशस्वी उद्योजकांची कोरोना संकटग्रस्तांना मदत

Next

मुंबई :अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले असून कोरोनाच्या संकटात ते आता इतरांना मदत करीत आहेत.
काही काळापूर्वी बेरोजगार असलेल्या या तरुणांना महामंडळाने कर्जाच्या रूपाने मदतीचा हात दिला आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रेरित केले. व्यवसायात यशस्वी होऊन राज्यातील असे अनेक तरुण आता कोरोना संकटग्रस्तांना मदतीचा हात देत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना स्वयंरोजगारासाठी व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मदत करण्यात येते. महामंडळामार्फत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कर्जाचा पुरवठा करण्यात आला आहे. १५ हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या कर्जात एकही थकबाकीदार नाही. सर्व लाभार्थी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करत आहेत. कर्ज घेऊन स्वयंरोजगार सुरू केलेले राज्याच्या विविध भागातील हे लाभार्थी आता स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. या लाभार्थ्यांनी तसेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करावी, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत राज्यातील विविध भागांतील लाभार्थ्यांनी त्यांच्या स्वत:च्या योगदानातून संकटग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाच्या कर्ज योजनेतून व्यवसाय सुरू करून यश मिळवलेले औरंगाबाद जिल्ह्यातील प्रशांत जगताप यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान दिले आहे.
>गरजूंसाठी अन्नदान
औरंगाबादच्या मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने प्रशांत जगताप यांनी व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गोरगरीब लोकांना अन्नदान केले. महामंडळाचे सातारा जिल्हा समन्वयक राहुल रमेश यादव हे संकटात अडकलेल्या गरजू वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, मनोरुग्ण, सफाई कर्मचारी व पोलीस कर्मचारी अशा ४० ते ५० जणांना दररोज घरी जेवण बनवून पार्सल करून गरजंूपर्यंत पोहोचवत आहेत. आतापर्यंत साधारण बाराशे लोकांपर्यंत त्यांनी मदत पोहोचवली आहे.

Web Title: Successful Entrepreneurs Help Corona Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.