काँग्रेसची मागणी: आज दुसरे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले
मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक सुरू असताना विकासविषयक घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ही निवडणूक स्थगित करावी आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली.विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांची भेट घेतली. केडीएमसी निवडणुकीवरून काँग्रेसमध्येच समन्वयाचा अभाव दिसून आला.कालच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त सहारिया यांची भेट घेऊन तक्रार केली होती. त्यावेळी विखे-पाटील अनुपस्थित होते. त्याची चर्चा झाल्याने आज त्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्याचे समजते. शिवाय, कालच्याच निवेदनातील मजकूर आजच्या निवेदनातही होता. त्यामुळे काँग्रेसने काय साधले,असा सवाल ज्येष्ठ नेत्यांना पडला आहे. (विशेष प्रतिनिधी)